Supriya Sule :  सरकार ते रोजच आरोप करत आहेत. सहा महिने सत्तेत आल्यापासून या लोकांनी काहीच काम केलेलं नाही. स्वतःचं काही सांगण्यासारखे नाही त्यामुळे रिवाइंड आणि प्ले हे काम हे ईडी सरकार करत आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार  सुप्रिया सुळे यांनी केली. त्या आज पुणे दौऱ्यावर आहेत त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्याचबरोबर त्यांनी अनेक विषयांवरुन सत्ताधाऱ्यावर टीका केली. 


सगळं दुर्दैवी आहेत. हे ईडी सरकार प्रशासनात कमी आहेत आणि चुकीची कामं पण चालू आहेत. हे लोकं मोदीजी यांचे भाषण ऐकत नाहीत. मोदीजी म्हणतात मी प्रधान सेवक आहे. सेवा सोडून हे लोक सगळेच काम करतात, अशा शब्दांत त्यांनी संतोष बांगर यांच्यावर निशाणा साधला आहे. 


मुंबईत  लिंगायत आणि सकल हिंदू समाजाकडून मोर्चा 


एकतर मोर्चा म्हणजे सरकार विरोधात आहेत. हे असंवेदनशील सरकार आहे म्हणून लोकांना रस्त्यावर उतरायला लागतं आहे. लिंगायत समाजाचे प्रश्न समजून घ्यायला हवे. तसेच लव्ह जिहादचा अर्थ मला माहित नाही. लव्हचा अर्थ मला कळतो जिहादचा अर्थ मला कळत नाही, असंही त्या म्हणाल्या.


शिवसेना चिन्हाचं काय ?


उद्या 30  जानेवारीला शिवसेना पक्षाच्या चिन्हावर सुनावणी होऊ शकते. त्यावर सुप्रिया सुळेंनी भूमिका स्पष्ट केली आहे. त्या म्हणाल्या, शिवसेना पक्षाची स्थापना बाळासाहेब ठाकरे यांनी केली आहे. त्याचा उत्तराधिकारी देखील त्यांनी स्वत: ठरवलेला आहे. त्यामुळे पक्षाचे चिन्ह वेगळ्या कुणाला तरी मिळणे, ते योग्य होणार नाही. ज्यांनी पक्ष काढला, ज्यांनी उत्तराधिकारी ठरवला. त्यांनाच ते चिन्ह मिळाले पाहिजे, असंही मत त्यांनी व्यक्त केलं आहे. 


सुप्रिया सुळेंची दोन दिवसांपूर्वी फडणवीसांवर फटकेबाजी


सुप्रिया सुळे शिंदे फडणवीस सरकारवर कायम टीका करत असतात. त्यांना सरकार कसं चालवायचं याचे सल्ले देत असतात.देवेंद्र फडणवीसांनी महाविकासआघाडी सरकारने मला तुरुंगात टाकण्याचं टार्गेट केलं होतं, असं वक्तव्य केलं होतं. त्यावर सुप्रिया सुळेंनी टीका केली होती.  "आप से ये उम्मिद न थी", अशा शब्दांत त्यांनी प्रतिक्रिया दिली होती. या सगळ्या खोट्या गोष्टी पसरवण्यापेक्षा त्यांनी नागरिकांच्या सुरक्षिततेवर काम करावं. पुण्यातील किंवा राज्यातील अनेक गुन्ह्यांबाबत चर्चा करायला हवी होती. त्यासोबतच त्यांनी गुन्ह्यांतं प्रमाण कसं कमी करता येईल, याकडे लक्ष द्यायला हवं, असा सल्ला त्यांनी दिला होता.