पुणे: बदलापूरमधील शाळेत झालेल्या लैंगिक अत्याचार (Badlapur Case) प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde Encounter) याचा सोमवारी मुंब्रा परिसरात झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. अक्षयने पोलिसांकडील बंदूक हिसकावून एका पोलीस कर्मचाऱ्यावर गोळी झाडली होती. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे (Akshay Shinde Death) याचा मृत्यू झाला. या प्रकरणावरून विरोधकांकडून पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.अशातच आज शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज पुण्यत पत्रकार परिषद घेत या घटनेबाबत संशय व्यक्त करत, पहिल्या दिवसापासून पोलिसांनी हलगर्जीपणा केला म्हणत पोलिसांसह, सरकारवर हल्लाबोल केला आहे.


अक्षय शिंदे (Akshay Shinde Encounter) याला शिक्षा व्हायलाच पाहिजे होती. परंतु, कायद्याची प्रक्रिया बायपास होता कामा नये. पहिल्या दिवसापासून पोलिसांनी हलगर्जीपणा केला. पोलिसांकडून तपास संथ गतीने सुरू होता. अक्षय शिंदेला तळोजा मधून बदलापूर मध्ये न्यायचं असेल तर गाडी मुंब्रा कडे का नेली? पोलिसांनी चार्जशीट रविवारी का फाईल केलं? ज्या पिस्तूलने अक्षयने गोळी झाडली ती पिस्तूल अनलोडेड असते. मग अक्षय शिंदे याला पिस्तूलचे लॉक कसे काढता आले? दोन्ही हातात बेड्या असलेला माणूस पोलिसांच्या कमरेला लागलेलं पिस्तूल कसं काढेल, असा सवाल देखील सुषमा अंधारेंनी व्यक्त केला आहे.


संजय शिरसाट यांनी या सगळ्या प्रकरणावर संशय व्यक्त केला आहे.अक्षय शिंदे (Akshay Shinde Encounter) गतिमंद होता असे पोलिसांनी सांगितलं होतं. तर मग तो एवढा हुशार कसा निघाला? संजय शिंदे वादग्रस्त पोलीस अधिकारी आहे. विजय पलांडे याला पळवून लावण्यात त्यांचा हाथ होता. प्रदीप शर्मा यांचा तो जवळचा होता. हा माणूस सस्पेंड होता. अक्षय शिंदे याला संपवल्यामुळे हे प्रकरण संपत नाही. कोणाला वाचवलं जातं आहे ? ही संपूर्ण घटना हे राज्य प्रायोजित दहशतवाद आहे, अक्षय शिंदे प्रकरणावर आम्ही कोर्टात जाणार असंही यावेळी सुषमा अंधारेंनी म्हटलं आहे. तर ३००२ किंवा ३०१४ मध्ये तारीख दिली तरी आम्ही न्याय मागत राहणार असंही त्यांनी म्हटलं आहे.


 प्रकरणाची न्यायधिशांच्या समितीकडून चौकशी व्हायला पाहिजे


संजय शिंदे आणि इतर अधिकाऱ्यांचे निलंबन व्हायला पाहिजे. या प्रकरणाची न्यायधिशांच्या समितीकडून चौकशी व्हायला पाहिजे. ठाण्यातून जे सत्ता केंद्र चालते त्याबद्दल आम्हाला विश्वास नाही. २४ तासात घटनेची माहिती मानवाधिकार यांना दिली पाहिजे, अशी मागणी देखील यावेळी सुषमा अंधारे यांनी केली आहे. 


ही फेक एन्काऊंटरची स्क्रिप्ट आहे.मी प्रश्न उपस्थितीत केला आहे, मग फडणवीस यांनी काय केलं पाहिजे. ९ एमएमचे पिस्तूल सामान्य माणसाला त्याचं लॉक उघडता येत नाही, असं म्हणत त्यांनी या गोळीबाराबाबत शंका उपस्थित केल्या आहेत. तर या प्रकरणावर एसआयटी स्थापन करणे म्हणजे थट्टा आहे. माझीच बॅट, माझाच बॉल असं झालं असं म्हणत हल्लाबोल केला आहे.
पोलिसांनी एक कपोकल्पित कथा कशी मानायची? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.