पुणे : पुण्यातल्या मोशी टोलनाक्याच्या चिंबळी फाट्याजवळील शिप इंडिया कंपनीला लागलेली आग तीन तासापासून धुमसत आहे. यात आसपासचे  8 गोडाऊनही आगीच्या कचाट्यात सापडलेत.


पुण्यातील मोशी टोलनाक्याच्या चिंबळी फाट्याजवळ शिप इंडिया नावाची कंपनी आहे. या कंपनीला दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास आग लागली. या कंपनीत महिंद्रा लॉजिस्टिकच्या गोडाऊनचाही समावेश आहे.

कंपनीच्या गोडाऊनमधील प्लास्टिक मटेरियलमुळे ही आग लागल्याचा अंदाज असून, या आगीमुळे दोन गाड्या जळून खाक झाल्या आहेत.

आत्तापर्यंत अग्निशमनच्या दलाच्या एकूण 7 ते 8 गाड्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असून, तीन तासानंतरही आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना यश आलेलं नाही.

दरम्यान काही गोडाऊनला लागलेली आग विझवण्यात आली असली, तरी काही गोडाऊनमध्ये आगीनं रौद्र रूप धारण केलं आहे. अग्नीशमन दलाचे जवान आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.