पुणे : शिवसेना आणि आघाडीची मते एक झाली, तर आगामी काळात भाजपचा पाडाव करता येऊ शकतो, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. अशा प्रकारचं विधान करुन त्यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला तिसऱ्या आघाडीमध्ये सामील होण्याचं आमंत्रणच दिलं आहे. आज रविवारी पुण्यात झालेल्या राष्ट्रवादीच्या 19 व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.


पालघरमध्ये विजय झाल्याचा भाजपचा दावा किती पोकळ आहे हे सांगताना पवारांनी समविचारी पक्षांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे.  नोटाबंदी, सरकारची चार वर्षे, ईव्हीएम बिघाड, महाराष्ट्र सदन अशा अनेक मुद्द्यांवरून पवारांनी सरकारला लक्ष्य केलं आहे.

पुण्यातल्या शिंदे विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला महाराष्ट्रभरातून हजारो राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती.

दरम्यान मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना आलेल्या धमक्या या केवळ सहानुभूतीसाठी पेरलेल्या बातम्या असल्याचा संशयही पवारांनी व्यक्त केला आहे.

याच कार्यक्रमात राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांनी जेलमधून बाहेर आल्यानंतर आपलं पहिलं जाहीर मनोगत मांडलं.

ज्यांनी माझ्या पडत्या काळात, माझ्या कुटुंबियांना आसरा दिला, त्यांना सोडून मी दुसऱ्या पक्षात कसा जाईन? अशा शब्दात त्यांनी राष्ट्रवादी सोडण्याच्या वावड्यांना पूर्णविराम दिला. इतकंच नाही, तर कोणताही घोटाळा झाला नसताना मला डांबण्यात आलं, पण मी निर्दोषत्व सिद्ध केल्याशिवाय शांत राहणार नाही, असा एल्गारही पुकारला. यावेळी छगन भुजबळांना गहिवरुनही आलं. भाषणामध्ये त्यांनी अनेकदा साहिर लुधियानवी यांच्या काव्य रचनांचा वापरही केला.