पुणे : पुण्याच्या उपमहापौरपदी आरपीआयच्या नगरसेवकाची निवड करावी, अशी मागणी खासदार संजय काकडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मात्र, भारतीय जनता पक्षाच्या ‘कमळ’ चिन्हावर निवडून आलेल्या नगरसेवकांना आरपीआयचे नगरसेवक कसं म्हणायचं हा प्रश्न उपस्थित झाला आहे.


पुण्यात आरपीआय आठवले गट आणि भारतीय जनता पक्षाची युती आहे. मात्र, आरपीआय आठवले गटाच्या पुण्यातील नेत्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून भाजपचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय निवडणुकीआधी घेतला होता. त्यामुळे रामदास आठवलेंनी त्या उमेदवारांना त्यांच्या पक्षातून निलंबितही केलं होतं.

आरपीआयमधून भाजपमध्ये प्रवेश करून निवडणूक लढवणाऱ्यांपैकी पाच उमेदवार नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. त्यापैकी एकाला उपमहापौर करण्याची मागणी खासदार संजय काकडे यांनी मुख्यमंत्रांकडे केली आहे.