पुणे :सध्या राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आणि नागरिकांना दुष्काळाचा फटका बसताना दिसत आहे. त्यातच पुरंदर आणि बारामतीला वरदान ठरलेलं नाझरे धरण कोरडं पडलं आहे. धरणाला अक्षरशः भेगा पडला असून धरण कोरडे पडल्याने 56 गावांवर पाणी टंचाईचे मोठे संकट निर्माण झाले आहे. नाझरेमध्ये पाच-सहा वर्षांत पहिल्यांदाच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 


नाझरे धरणाची पाणी साठवणूक क्षमता 788 दशलक्ष घनफूट एवढी आहे. तर मृतसाठा 200 दशलक्ष घनफूट आहे. या धरणावर पुरंदर तालुका 40 गावे तर बारामती तालुक्यातील 16 अशी एकूण 56 गावे पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून आहेत. तर सुमारे तीन हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते. तीर्थक्षेत्र जेजुरी शहर जेजुरी एम आय डी सी तसेच इंडीयन सिमलेस कंपनीला या धरणातून पिण्यासाठी पाणी पुरवठा होतो. पुरंदर तालुक्यात कमी पाऊसामुळे नाझरे धरणात पाणीसाठा होवू शकला नाही.


नाझरे धरणात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेती, जनावरं आणि पिण्याच्या पाण्याचादेखील मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांवर बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. पिकं आणि जनावरांना जगवायचं कसं?, असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. या धरणावर काही प्रादेशिक योजनादेखील अवलंबून आहेत. या दुष्काळामुळे सगळ्यांचच भवितव्य टांगणीला लागलं आहे.