चेन्नईच्या शाळेतील तीन विद्यार्थी पुण्यातील धरणात बुडाले
एबीपी माझा वेब टीम | 25 Apr 2018 11:35 PM (IST)
चेन्नईहून ईसीएस मॅट्रिक्यूलेशन शाळेतून 20 विद्यार्थ्यांचा ग्रुप मुळशीतील जॅकलीन स्कूलमध्ये एक आठवड्याच्या समर कॅम्पसाठी आला होता
पुणे : चेन्नईतील शाळेतून समर कॅम्पसाठी आलेले तीन विद्यार्थी पुण्यातील धरणात बुडाल्याची घटना घडली आहे. त्यापैकी एकाचा मृतदेह सापडला असून दोघांचा शोध सुरु आहे. पुण्यात मुळशीमध्ये कातरखडक गावाजवळ धरणात तीन विद्यार्थी बुडाले असून तिघंही 13 वर्षांचे आहेत. दानिश राजा, संतोष के आणि सर्वन्ना अशी बुडालेल्या मुलांची नावं आहेत. चेन्नईहून ईसीएस मॅट्रिक्यूलेशन शाळेतून 20 विद्यार्थ्यांचा ग्रुप मुळशीतील जॅकलीन स्कूलमध्ये एक आठवड्याच्या समर कॅम्पसाठी आला होता. ही सर्व मुलं 13 ते 15 वर्षे वयोगटातील असून त्यांच्यासोबत एक पुरुष, तर तीन महिला शिक्षक होत्या. बुधवारी त्यांच्या कॅम्पचा पहिलाच दिवस होता. कॅम्पची वेळ संपल्यानंतर संध्याकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास विद्यार्थी आणि शिक्षक धरणाजवळ आली. त्यातील तीन मुलं कातरखडक धरणाच्या पाण्यात गेली. मात्र त्यांना पाण्याबाहेर पडता आलं नाही. एका विद्यार्थ्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पौडच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला आहे. रात्र झाल्यामुळे इतर दोघांचं शोधकार्य थांबवण्यात आलं असून सकाळी परत त्यांचा शोध घेण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.