पुणे: पुण्यातील स्वारगेट प्रकरणातील पिडीत तरूणीने पोलिसांवरती गंभीर आरोप केले आहेत. राज्याच्या सचिवांना पत्र लिहून पिडीतेने हे आरोप केले आहेत. यामध्ये तरूणीने आरोपी दत्ता गाडेने माझ्यावर दोनवेळा बलात्कार केला. तिसऱ्यांदा त्याला आपल्यासोबत अनैसर्गिक कृत्य करायचे होते, मात्र आपण विरोध केल्याने तो पळून गेला. या प्रकरणाची चौकशी सुरु झाली तेव्हा आपली इच्छा नसताना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपली वैद्यकीय चाचणी केली, असं या तरूणीने म्हटलं आहे. त्याचबरोबर पुरुष पोलीस अधिकारी देखील आपल्याकडे चौकशी करत होते असं या मुलीने म्हटलं आहे.

तर आपल्या चारित्र्यावर संशय व्यक्त करणारी वक्तव्ये आरोपीच्या बाजुने आणि काही राजकिय नेत्यांनी केली. आपली बदनामी थांबवण्यात यावी आणि अशा वक्तव्यांवर बंदी घालण्याची मागणी आपण पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. मात्र दाद मिळाली नाही. या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अजय मिसर यांच्याबद्दल आपल्याला आत्ताच आक्षेप घ्यायचा नाही. मात्र त्यांच्यावर आक्षेप घेता येईल अशी माहिती आपल्याकडेच उपलब्ध आहे. या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून असीम सरोदे यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी तिने केली आहे. 

 पत्रातील काही महत्त्वाचे मुद्दे 

1) पुरुष वैद्यकीय अधिकाऱ्यांनी माझी इच्छा नसताना माझी संमती घ्यायची व स्वतः माझी वैद्यकीय चाचणी करायची 2) अनेक पुरुष पोलीस अधिकाऱ्यांना मी माझ्यावर कसा अत्याचार करण्यात आला ते सांगायचे 3) आरोपी दत्ता गाडे याने दोनदा माझ्यावर बलात्कार केल्यानंतर तिसऱ्यांदा त्याने जबरदस्तीचा प्रयत्न केला 4) तेव्हा मी पूर्ण ताकदीने विरोध केला होता, कदाचित दोनदा लैंगिक अत्याचार केल्याने त्याने सुद्धा माघार घेतली आणि तो पळून गेला 5) पुणे पोलिसांकडून मला सांगण्यात आले होते की तुला तीन वकिलांचे नावे आम्ही सुचवू आणि त्यातून तुझ्या पसंतीचे वकील आम्ही नेमू6)मी असीम सरोदे यांची नेमणूक करावी अशी मागणी केली असता, तुला यायला एक दिवस उशीर झाला असं पुणे पोलिसांकडून मला सांगण्यात आले, म्हणजे अन्यायग्रस्त मुलगी म्हणून माझ्या म्हणण्याला काहीच महत्त्व नाही असा कायदा आहे का?7) मला अजय मिसार यांच्या बद्दल आत्ताच आक्षेप घ्यायचे नाहीत, पण मी माहितीशास्त्र अभ्यासक्रम केला असल्याने माझ्याकडे आक्षेप घेण्यासारखी माहिती आहे हे नक्की आपल्याला सांगू इच्छिते 8) घटनेच्यावेळी मी आरडाओरडा केला त्यानंतर माझा आवाज खोल गेला, आवाजच निघत नव्हता व त्याचवेळी माझ्या मनात बलात्काराच्या विविध घटनांमध्ये विरोध केल्याने जखमी झालेल्या मुली मारून टाकण्यात आलेल्या गोष्टी आल्या मी जीव वाचवणे महत्त्वाचे मानले