आई-वडील रागावल्याने मुलाने सोसायटीतील दुचाकी जाळल्या
एबीपी माझा वेब टीम | 03 Nov 2017 08:09 PM (IST)
पुण्यातील सदाशिव पेठेत असलेल्या एलआयसी कर्मचाऱ्यांच्या वेस्टर्न इंडिया सोसायटीत हा प्रकार घडला.
पुणे : आई-वडील ओरडल्याचा राग पुण्यातील अल्पवयीन तरुणाने इतरांच्या दुचाक्यांवर काढला. रागाच्या भरात मुलाने जाळलेल्या नऊ दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. पुण्यातील सदाशिव पेठेत असलेल्या एलआयसी कर्मचाऱ्यांच्या वेस्टर्न इंडिया सोसायटीत हा प्रकार घडला. आई-वडील ओरडल्यामुळे रात्री सव्वा दोनच्या सुमारास मुलानं गाड्या पेटवल्या. इमारतीखाली फूटपाथ परिसरात या बाईक पार्क करण्यात आल्या होत्या. या प्रकाराची माहिती मिळाल्यावर तातडीनं अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या, मात्र तोपर्यंत नऊ दुचाकी जळून खाक झाल्या होत्या. या प्रकरणी विश्रामबागवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सोसायटीतील सीसीटीव्ही फूटेज तपासायला घेतलं. त्यानंतर गाड्या जाळणाऱ्या मुलालाही ताब्यात घेण्यात आलं. आई- वडिलांच्या रागाचा मोठा फटका सोसायटीतल्या इतर रहिवाशांना बसला आहे.