पोलीस निरीक्षक धनंजय धुमाळचं निलंबन, गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे | 11 Aug 2016 02:10 PM (IST)
पुणे: 25 लाखाची खंडणी मागणाऱ्या पुण्यातील पोलीस निरिक्षक धनंजय धुमाळला वाचवण्याचा प्रयत्न अखेर अयशस्वी ठरला आहे. कारण एबीपी माझाच्या पाठपुराव्यानंतर आणि राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाल्यावर पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी धुमाळचं निलंबन केलं आहे. बाणेरमधील सहा गुंठे जागेवरुन संदीप जाधव आणि इतर दोघांमध्ये वाद होता. त्यावरुन जाधव यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल होती. त्यामुळं कारवाई टाळण्यासाठी धनंजय धुमाळनं 25 लाखाची खंडणी मागितली होती. ज्याचं स्टिंग ऑपरेशन संदीप जाधवनं केलं. याची तक्रार पोलीस आय़ुक्तांकडे केल्यानंतर शुक्लांनी फक्त धुमाळची बदली करुन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. गेले 3 दिवस धुमाळला वाचवणाऱ्या शुक्लांवरही कारवाई करा अशी मागणी होऊ लागली आहे. विशेष म्हणजे संदीप जाधव यांच्यानंतर बांधकाम व्यावसायिक अजय चौधरी आणि रविंद्र बऱ्हाटेंनीही धुमाळनं पैशांसाठी धमकावल्याचा आरोप केला आहे. काय आहे नेमकं प्रकरण: बाणेरमधील सर्व्हे नंबर 90 मध्ये बांधकाम व्यावसायिक संदीप जाधव आणि त्याच्या भागीदारानं जमीन विकत घेतली. पण त्यावरुन वाद सुरु झाला. प्रकरण पोलीस ठाण्यात आलं. त्यानंतर पोलीस निरीक्षक धनंजय धुमाळनं संदीप जाधवला मोक्का आणि इतर गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन 25 लाखाची खंडणी मागितली. ती सुद्धा पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या नावानं. खरंतर स्टँडर्ड प्रोसिजरप्रमाणं संदीप जाधवच्या तक्रारीनुसार पोलीस निरीक्षक धनंजय धुमाळविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. मात्र तसं झालं नाही. उलट रश्मी शुक्ला यांनी धनंजय धुमाळची नियंत्रण कक्षाला बदली करुन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. संदीप जाधव आणि हेमंत गांधींनी 80 लाख रुपये स्टँप ड्युटी भरुन बाणेरमधील 15 गुंठे जमीन संजय मुथा यांच्याकडून विकत घेतली. मात्र संजय वाघमारे आणि राजेंद्र चांदेरे यांनी बाणेरमधील जागा आपली असल्याचा दावा करत न्यायालय गाठलं. दरम्यान मार्च 2016 मध्ये संजय मुथा आणि संदीप जाधव यांच्यातही वाद झाले. मुथा यांनी चतृ:श्रुंगी पोलिसात जाधव आणि गांधींविरोधात तक्रार दिली. त्यानंतर 30 मे रोजी एटीएसमध्ये काम करणाऱ्या धनंजय धुमाळ यांनी संदीप जाधवला समन्स बजावलं. खरंतर एटीएसचा आणि जमीन प्रकरणाचा संबंध नसतानाही रश्मी शुक्लांनी हे प्रकरण तपासासाठी धनंजय धुमाळकडे दिलं. एटीएसमध्ये असलेल्या धुमाळकडे प्रकरण सोपवल्यानंतर अडचण येऊ नये म्हणून रश्मी शुक्लांनी धुमाळची बदलीही प्रॉपर्टी सेलला केली आणि त्यानंतर मॅडमना 25 लाख रुपये द्यावे लागतील असं सांगून धुमाळ धमकावत राहिला. संबंधित बातम्या: