पुणे: पुण्यात गेल्या काही दिवसांपुर्वी  बोपदेव घाटात 21 वर्षीय तरूणीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील आरोपी अद्याप फरार आहेत, पोलिसांची अनेक पथकं आरोपीच्या शोधात आहेत, मात्र अद्याप कोणतीही अटक झालेली नाही, हे प्रकरण ताजं असतानाच पुण्यात पुन्हा एक महिला अत्याचाराची घटना घडली होती. पुण्यातून 32 वर्षे महिलेचे अपहरण करत तिला जंगलात नेत तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. 


पुण्यातील महिलेवर कर्जतच्या जंगलात अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची ही संतापजनक घटना उघडकीस आली. बत्तीस वर्षे महिलेचे अपहरण करून कर्जतच्या जंगलात नेऊन अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला आहे. याप्रकरणी 36 वर्षीय पुरुष आरोपी आणि 32 वर्षीय महिला आरोपी विरोधात सहकारनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, 32 वर्षीय महिला ही पुण्यातील सहकार नगर परिसरात पाहते. या महिलेला तिच्या ओळखीच्या 36 वर्षीय आरोपीने गाडीत बसवत कर्जतच्या जंगलात नेत तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. आरोपीने हाताने पिडीत महिलेला मारहाण करत दोन दिवस घरात डांबून ठेवत कर्जत येथील जंगलात नेत तिच्यावर जबरदस्ती करत तिच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडून तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला.या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.


बोपदेव घाट प्रकरणातील आरोपी अद्याप फरार


बोपदेव घाट परिसरात एका 21 वर्षीय तरूणीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली होती, अद्याप या घटनेतील आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत. मात्र, या घटनेने नागरिकांनी, राजकीय नेत्यांनी, अभिनय क्षेत्रातील व्यक्तींनी देखील प्रतिक्रिया दिली होती, या घटनेतील फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची वेगवेगळी पथकं काम करत आहेत, यातील दोन आरोपीचे स्केच देखील पोलिसांनी शेअर केले आहेत, तर आरोपींबाबत काही माहिती असेल तर ती कळवल्यास त्यांना इनाम देण्यात येईल अशी घोषणा देखील पोलिसांनी केली आहे, या परिसरात सीसीटीव्ही नसल्याने आरोपींना शोधण्यात मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. 


प्रकरणात तीन हजार मोबाइल क्रमांकाची तपासणी 200 हून सराईतांची चौकशी


या सामूहिक बलात्कार प्रकरणात तीन हजार मोबाइल वापरकर्त्यांची माहिती पोलिसांकडून काढण्यात येत आहे. त्याआधारे पोलिसांकडून तांत्रिक तपासण्याचे काम सुरू आहे. पोलिसांकडून दोनशेहून अधिक सराईतांची चौकशी करण्यात येणार आहे. गेल्या पंधरा दिवसांत बोपदेव घाटमार्गे गेलेल्या तीन हजार मोबाइल वापरकर्त्यांची माहिती पोलिसांकडून गोळा करण्यात आली आहे. बोपदेव घाटापासून जाणाऱ्या ७० ते ८० किलोमीटरपर्यंत सीसीटीव्ही मिळवण्यात येणार आहे. दोनशेहून अधिक सराइतांची चौकशी सुरू करण्यात आली आहे, या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे.