Chichwad Bypoll election : दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर चिंचवड (chinchwad bypoll election) मतदार संघाच्या रिक्त जागेसाठी नाना काटे यांच्या नावाची राष्ट्रवादीकडून घोषणा करण्यात आली आहे.  मात्र या जागेसाठी  नाना काटे आणि राहुल कलाटे (Rahul kalate) ही  दोन नाव सुरुवातीपासून चर्चेत होती. राहुल कलाटे यांचं नाव जाहीर करणार अशी माहिती सुरुवातीला सूत्रांनी दिली होती मात्र ऐन वेळी राष्ट्रवादीकडून नाना काटे यांचं नाव घोषित करण्यात आल्याने राहुल कलाटे आता बंडखोरी करण्याच्या तयारीत आहे. राहुल कलाटे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. 11:30 वाजता मोठी रॅली काढून समर्थकांसोबत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाणार आहे. 


राहुल कलाटे यांनी उमेदवारी अर्ज घेतला होता. हा अर्ज कोणत्या पक्षाकडून नाहीतर अपक्ष म्हणून घेतला होता. त्यावेळी चर्चेला उधाण आलं होतं. राष्ट्रवादीने उमेदवारी दिली नाही तर बंडखोरी करणार अशा चर्चादेखील राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. महाविकास आघाडीत ठाकरे शिवसेनेला जागा सुटल्यास पक्षाच्या चिन्हावर आणि तिढा सुटलाच नाही तर अपक्ष अर्थात पुन्हा बंडखोरी करण्याचा पर्याय ही त्यांनी राखून ठेवला होता. यावेळी ते म्हणाले होते की, मी 2014 आणि 2019 मध्ये चिंचवडच्या जनतेसमोर उमेदवार म्हणून गेलो आहे. मात्र जर महाविकास आघाडीने जनतेचं काम केलं तर त्यांच्याकडून मी जनतेसमोर जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.चिंचवड मतदारसंघात सर्वांचीच ताकद आहे. सगळ्यांनी एकत्रित निर्णय घेतला तर त्याचा या निवडणुकीला फायदा होणार आहे. मात्र त्यांच्या निर्णयाची मी वाट पाहणार आहे, असं राहुल कलाटे यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र चिंचवडमध्ये महाविकास आघाडीची जागा राष्ट्रवादीच्या नाना काटे यांना दिल्याने राहुल कलाटे बंडखोरी करणार आहेत. 


2019 मध्ये बंडखोरी करत भाजपच्या लक्ष्मण जगतापांसमोर आव्हान केलं होतं


2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती होती. मात्र शिवसेनेच्या राहुल कलाटे यांनी बंडखोरी करुन भाजपच्या लक्ष्मण जगतापांसमोर आव्हान उभं केलं होतं. त्यावेळी राहुल कलाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि वंचितचा पाठिंबा मिळवला होता. त्यामुळेच तेव्हाची लढत ही अटीतटीची झाली होती. आता कलाटे पुन्हा तीच खेळी  पुन्हा खेळणार आहेत. 


दोन पर्याय खुले ठेवलेले


राहुल कलाटे यांनी अपक्ष आणि दुसऱ्याच्या नावाने उमेदवारी अर्ज घेतला होता. महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाली तर ठिक नाही तर त्यांनी स्वत:साठी दुसरा पर्याय म्हणजेच अपक्ष उमेदवाराचा पर्याय राखून ठेवला होता. त्यांच्या या खेळीचा त्यांना फायदा झाला.