Pune Bandha Sushama Andhare :  पुणे बंदच्या मोर्च्यामध्ये सहभागी झालेले छत्रपती उदयनराजे भोसले यांचे विचार आम्हाला ऐकायला मिळतील असे वाटले, मात्र ते स्टेजवर आले नाहीत. महापुरुषांचा अवमान सहन न झाल्याने ते तडकाफडकी राजीनामा द्यायला दिल्लीला गेले का?” असा सवाल शिवसेनेचा (shiv sena) उपनेत्या सुषमा अंधारे (sushma andhare) यांनी उपस्थित केला. पुणे बंदच्या मूकमोर्चात त्या बोलत होत्या.


'भाजपला महापुरुष म्हणून गोळवलकर गुरुजी आणि हेडगेवारच हवेत, बाकी नेते मोडीत काढायचेत"


सध्या भाजपला महापुरुष म्हणून गोळवलकर गुरुजी आणि हेडगेवारच हवे आहेत, बाकी महापुरुषांना त्यांना मोडीत काढायचं आहे, असा हल्लाबोल (Shiv Sena) सुषमा अंधारे (sushma Andhare) यांनी भाजपवर केला.  देवेंद्र फडणवीस हे सरकार चालवत आहेत. त्यांनी फक्त पक्षापुरता नाहीतर राज्याचा विचार करायला हवा. फडणवीस एका पक्षाचे उपमुख्यमंत्री किंवा गृहमंत्री नसून महाराष्ट्राचे गृहमंत्री आहात, हे देवेंद्र फडणवीसांना लक्षात आणून द्यायला हवं. भाजपला महापुरुष म्हणून गोळवलकर गुरुजी आणि हेडगेवारच हवे आहेत. बाकी महापुरुषांना त्यांना मोडीत काढायचं आहे. यासाठी हा सगळा प्रकार ठरवून केला जात आहे, असा हल्लाबोल सुषमा अंधारे यांनी भाजपवर केला आहे.


मागील काही माहिन्यांपासून महापुरुषांचा अवमान केला जात आहे. राज्यपालांबद्दल आदर आहे, मात्र राज्यपालपदावर बसलेली व्यक्ती मात्र आदराच्या लायकीची नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यपालांना पदाचा विसर पडत आहे आणि ते पूर्णपणे भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखं वागत आहेत. या आधीदेखील त्यांनी अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. मात्र त्यांना कोणीही थांबवण्याचा प्रयत्न केला नाही, असाही आरोप सुषमा अंधारे यांनी भाजपवर केला आहे. 


'शाई साठवा आणि बोटावर लावा'


चंद्रकांत पाटलांवर फेकण्यात आलेली शाई किंवा यानंतर ज्यांच्यावर शाईफेक करण्यात येईल ती शाई साठवली पाहिजे आणि तीच शाई बोटावर लावली पाहिजे. तरच महापुरुषांचा अवमान करणारी विचारधारा पराभूत करण्यासाठी ती शाई बॅलेट पेपरमधून अत्यंत संविधानिक मार्गाने बाहेर निघाली पाहिजे, असंही त्या म्हणाल्या 


पुणे बंदला उत्तम प्रतिसाद


आज राज्यपालांविरोधात पुणे बंदची हाक दिली होती. या बंदला सर्व स्तरावरुन पाठिंबा दर्शवण्यात आला होता. सगळ्या संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. स्थानिक नागरिकदेखील सहभागी झाले होते. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 7000 पोलिसांचा बंदोबस्त शहरात होता.  मात्र महत्वाच्या नेत्यांनी या बंदकडे पाठ फिरवल्याचं बघायला मिळालं.