लोणावळा: लोणावळ्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून लोणावळ्यातील पर्यटन स्थळं पुढील दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय पोलीस प्रशासनानं घेतला आहे.


 

भुशी धरण, लायन्स पॉईन्ट, टायगर पॉईन्ट, लोहगड किल्ला आणि भाजे लेणी इथं पर्यटकांना शनिवार, रविवार जाता येणार नाही. अनेकदा पर्यटकांना त्यांचा उत्साह नडतो. त्यामुळे अनेकांना आपला जीवही गमवावा लागतो. त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे.

 

मुसळधार पावसामुळे भुशी धरण 100 टक्के भरलं आहे. मोठ्या प्रमाणात धरणातून पाणी सोडलं जात आहे. तसंच धुकं आणि वाढत्या दरड कोसळण्याच्या घटनांमुळे पोलीस प्रशासनानं पर्यटन स्थळं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.