Pune News: लातूरच्या प्रवाशांनी पुणे रेल्वे स्थानकात गोंधळ घातल्याने मुंबई-बिदर एक्स्प्रेसचा (Mumbai Bidar Express) जवळपास दोन तास खोळंबा झाला. मुंबई-बिदर एक्स्प्रेसमधील प्रवाशांनी गर्दीमुळे डब्याचे दरवाजे बंद केल्याने पुणे स्थानकातील (Pune Railway Station) प्रवाशांनी आक्रमक भूमिका घेतली. काही प्रवाशांनी रेल्वेसमोर झोपून आंदोलन (Railway Passenger Protest) केले. रेल्वे पोलिसांनी (Railway Police) आंदोलकांची समजूत घातल्यानंतर एक्स्प्रेस रवाना झाली. 


आज लातूर जिल्ह्यातील 351 ग्रामपंचायतची निवडणूक आहे. पुणे मुंबई ठिकाणी कामाला असलेली अनेक लातूरकर गावाकडे मतदानासाठी येत असतात. मुंबई-बिदर एक्स्प्रेस काल रात्री मुंबईवरून येतानाच प्रचंड गर्दीने भरून गेली होती. त्यानंतर ही गाडी पुणे रेल्वे स्टेशनवर आली तेव्हा गाडीत जागा नसल्याने आतील प्रवाशांनी दरवाजे उघडले नाहीत. 


शनिवारी, रात्रीच्या सुमारास हा गोंधळ झाला. पुणे आणि जवळील भागातून लातूरच्या दिशेने येणाऱ्या लातूरकरांनी एक्स्प्रेसमध्ये शिरण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, त्यांना रेल्वेत येण्यास दिले नाही. अखेर नाईलाजास्तव प्रवाशांनी रेल्वे इंजिन समोर ठाण मांडले. यावेळी संतप्त प्रवाशांनी जोरदार घोषणाबाजी केली. महिला आणि तरुण मुलांचा या आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग होता. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन रेल्वे पोलिसांनी तातडीने धाव घेतली. पोलिसांनी आंदोलक प्रवाशांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, दरवाजे उघडल्याशिवाय आणि एकूण एक प्रवासी रेल्वे बसल्यास शिवाय रेल्वे हलू देणार नाहीत अशी भूमिका प्रवाशांनी घेतली होती.


विलासराव देशमुख यांनीही गाडी सुरू केलेली आहे आणि लातूरकरांना जागा नाही असा संताप व्यक्त करत महिला प्रवाशांनी जोरदार घोषणाबाजी केली. अखेर रेल्वे पोलिसांनी सर्व परिस्थिती हाताळत रेल्वेच्या बोगीची दारे उघडली. सर्व प्रवाशांना व्यवस्थितपणे रेल्वेत बसवण्यात जवळपास दोन तास गेले. त्यामुळे ही एक्स्प्रेस दोन तास उशिराने धावत होती. परिणामी लातूर स्थानकावर गाडी दोन तास उशिरा आली. सकाळी सहा वाजता येणारी एक्स्प्रेस आठ वाजता दाखल झाली. 


विविध जिल्ह्यांत ग्रामपंचायत निवडणूक


आज राज्यातील विविध जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक पार पडत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावागावात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संवेदनशील असलेल्या गावांमध्ये अधिकचा कुमक तैनात करण्यात आली आहे.


जिल्हानिहाय निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायती


अहमदनगर- 203, अकोला- 266, अमरावती- 257, औरंगाबाद- 219, बीड- 704, भंडारा- 363, बुलडाणा- 279, चंद्रपूर- 59, धुळे- 128, गडचिरोली- 27, गोंदिया- 348, हिंगोली- 62, जळगाव- 140, जालना- 266, कोल्हापूर- 475, लातूर- 351, नागपूर- 237, नंदुरबार- 123, उस्मानाबाद- 166, पालघर- 63, परभणी- 128, पुणे- 221, रायगड- 240, रत्नागिरी- 222, सांगली- 452, सातारा- 319, सिंधुदुर्ग- 325, सोलापूर- 189, ठाणे- 42, वर्धा- 113, वाशीम- 287, यवतमाळ- 100, नांदेड- 181 व नाशिक- 196. एकूण- 7,751.