पुणे: लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणारे मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. मनसे राज्यात 225 ते 250 जागांवर निवडणूक लढवेल, असे राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सांगितले होते. त्यानंतर आता महायुतीच्या गोटातून त्यांच्या मनधरणीसाठी पहिला अप्रत्यक्ष प्रयत्न शिंदे गटातून (Shinde Camp) झाला आहे. राज्याचे शिक्षणमंत्री आणि शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी राज ठाकरे यांच्याशी विधानसभेलाही (Vidhansabha Election 2024) युती होऊ शकते, असे संकेत दिले आहेत. आमची राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांचं मतपरिवर्तन होईल, असा विश्वास केसरकर यांनी व्यक्त केला. ते शुक्रवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.


विधानसभा निवडणुकीला अजून उशीर आहे. प्रत्येक पक्ष हा सर्व जागांची तयारी करत असतो. आमची महायुती असून मागच्या वेळी राज ठाकरे यांनी आम्हाला बिनशर्त पाठिंबा दिला होता. राज ठाकरे यांचे शिंदे साहेब तसेच फडणवीस यांच्याशी चांगले संबंध आहे. विशेषतः ते आमच्या विचाराचे आहे. म्हणून जेव्हा त्यांच्याशी बोलणे होईल तेव्हा नक्कीच त्यांचा मतपरिवर्तन होईल, असे दीपक केसरकर यांनी म्हटले.


आमदार अपात्रतेच्या सुनावणीबाबत दीपक केसरकरांचं भाष्य


दीपक केसरकर यांना आमदार अपात्रेबाबत न्यायालयीन लढाई सुरू झाली आहे, याबाबत विचारलं असता ते म्हणाले की, न्यायालयीन प्रक्रिया ही बराच काळ चालत असते. त्यामुळे हा मेजर निर्णय होणार आहे. एक व्यक्ती लोकशाहीत निर्णय घेऊ शकतो का ? कोणताही निर्णय घेताना पक्षाची बैठक बोलावली पाहिजे पण असं झालेलं नाही आम्हाला जर यातून सुटायचं असता तर आम्ही सहज दुसऱ्या पक्षात किंवा दुसरा गट तयार केला असता. पण मी हे केलेले नाही. आम्ही लोकशाहीच्या रक्षणासाठी आमची ही लढाई आहे. आमदारकी पणाला लावून आम्ही लोकशाहीची ही लढाई लढत आहोत. यामध्ये आम्हाला यश येईल, याची शंभर टक्के आम्हाला खात्री आहे. आज जे बेकायदेशीर आणि घटनाबाह्य सरकार म्हणत आहे, त्यांनी आरश्यात पाहावं. कारण सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे की आमदारांनी निवडून आणलेलं हे सरकार आहे. यांना काम करण्याचा अधिकार आहे. उगाच विरोधक खोटं आणि रेटून बोलत असल्याचे यावेळी दीपक केसरकर म्हणाले.


यावेळी केसरकर यांना मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत विचारलं असता ते म्हणाले की, फार मोठं षडयंत्र देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत केले जात आहे. खरं तर मराठा समाजाला जे आरक्षण मिळालेला आहे ते फडणवीस साहेब यांनी स्वतः लक्ष घालून ते आरक्षण टिकवलं होतं. महाविकास आघाडीने ते आरक्षण टिकवलं नाही. आता आम्ही दिलेला आरक्षण हे देखील टिकणारं आरक्षण आहे. हे जे दहा टक्के आरक्षण मिळालेला आहे. त्यामुळे मराठा समाजात समाधानाची बाब आहे. परंतु अशी भूमिका घेतल्याने वातावरण बिघडत आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका सरकारची असल्याचे यावेळी केसरकर यांनी सांगितले.


आणखी वाचा


'बिनशर्ट' पाठिंबा देणारे आता स्वबळाची भाषा करतात, एकाच महिन्यात भूमिका बदलली, विधानसभेच्या अपशकुनाची सुरुवात : संजय राऊत