Pune School Fees : शाळेच्या पहिल्याच दिवशी विध्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार शिक्षणाचं माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यातून समोर आला आहे. फी भरली नाही म्हणून असंख्य विध्यार्थ्यांना शाळेच्या पटांगणात बसवण्यात आलं. शाळेचा पहिला दिवस असल्यानं विद्यार्थी मोठ्या उत्साहाने शाळेत पोहचले. मात्र शाळा सुरू होण्यापूर्वीच शिक्षकांनी फी न भरलेल्या विद्यार्थ्यांची यादी बाहेर काढली आणि त्या विध्यार्थ्यांना वर्गाबाहेरच ठेवलं. हा प्रकार समजताच पालकांनी शाळेत मोठी गर्दी केली. पालकांनी शाळा प्रशासनाला याबाबत जाब विचारला मात्र प्रशासनाने त्यांना केराची टोपली दाखवली. त्यानंतर माध्यमांसमोर ही घडल्या प्रकाराचा पश्चाताप झाला नसल्याचंच बोलून दाखवलं. घडलेल्या या प्रकारामुळे पालकांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. 


फी न भरलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत किंवा वर्गात न बसू देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे फी भरलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत बसू दिलं मात्र ज्या मुलांनी फी भरली नव्हती त्या मुलांची यादी तयार करुन  त्यांना शाळेच्या पटांगणात बसवलं. त्यांच्याकडून वेगवेगळी अॅक्टिव्हिटी करुन घेतली. त्यानंतर रविवारपर्यंत फी भरण्यासाठी मुदत वाढवून देण्यात आली असल्याचं शाळा प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान रविवारपर्यंत शाळेतील मुलांना वर्गात बसू दिलं जाणार असल्याचंही स्पष्ट केलं आहे.


शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांसोबत हा प्रकार घडला. काही मुलांना सकाळीच घरी पाठवण्यात आलं होतं. तर काही मुलांना शाळेच्या पटांगणात बसवून ठेवण्यात आलं. अनेक शाळांमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांचं स्वागत करण्यात येतं मात्र या शाळेत मुलांना थेट वर्गाच्या बाहेर पटांगणात बसवण्यात आलं. त्यामुळे शाळेतील पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांवर अन्याय झाला, असा संताप पालकांनी व्य़क्त केला आहे. 


कधी बाहेर काढलं तर कधी डांबून ठेवलं?


काही महिन्यांपूर्वी शाळेची फी न भरल्याच्या कारणावरुन विद्यार्थ्यांना डांबून ठेवल्याचा प्रकार पुण्यात समोर होता. वाघोलीतील लेक्सिकॉन शाळेतील ही घटना आहे. वाघोली येथील लेक्सिकॉन इंटरनॅशनल स्कूलची फी भरली नसल्याने विद्यार्थ्यांना शाळा सुटल्यानंतर डांबून ठेवल्याप्रकरणी पालकांनी आणि मनसे पदाधिकारी यांनी शाळेविरोधात लोणीकंद पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली होती. संबंधितांवर खंडणी आणि अपहरणाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी तक्रारीत करण्यात आली होती. शाळेच्या मुख्याध्यापकांनी यांनी मात्र आरोप फेटाळत पालकांचा गैरसमज झाल्याचं सांगितलं होतं.  फी भरा आणि मुलांना घेऊन जा असे शाळेकडून सांगण्यात आल्याचे काही पालकांनी सांगितले. फी न भरलेल्या विद्यार्थ्यांचे पालक धावत पळत शाळेत आले आणि शाळेने केलेल्या प्रकाराबाबत विचारणा केली होती.