Uday Samant Attack : शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि माजी मंत्री उदय सामंत यांच्या कारवर झालेल्या हल्ल्यानंतर पुणे पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. रात्रभर भारती विद्यापीठ पोलिसांनी शिवसैनिकांची धरपकड केली असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या 'शिवसंवाद' सभेच्या आयोजकांसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. अजूनही काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. 


शिवसेना नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांची कात्रजमध्ये 'शिवसंवाद' यात्रा आयोजित करण्यात आली होती. यासाठी हजारो शिवसैनिकांची गर्दी झाली होती. या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील पुणे दौऱ्यावर होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दगडूशेठ गणपती मंदिरात दर्शनासाठी येणार होते. त्यांच्या आधीच उदय सामंत हे मंदिरात जात असताना काही जणांच्या जमावाने उदय सामंत यांच्या कारवर हल्ला केला. यावेळी गद्दार..गद्दारच्या ही घोषणा देण्यात आल्या होत्या. या हल्ल्यात सामंत यांच्या कारची काच फुटली. या हल्ल्या प्रकरणी मुख्य आयोजक संभाजी थोरवे, राजेश पळसकर, चंदन साळुंके, सूरज लोखंडे, रुपेश पवार यांना अटक करण्यात आली आहे. तर, पंधरा लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणी आणखी काहीजणांना अटक होण्याची शक्यता आहे. 


या घटनेनंतर गाडीवर दगड मारुन पळून जाणं ही मर्दुमगी नाही. कायदा सुव्यवस्थेचं पालन करण्याचं काम सरकारचं आणि पोलिसांचं आहे. त्यामुळे ज्यांनी हे केलंय त्यांच्यावर कारवाई करण्याचं काम पोलीस करतील असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. त्यानंतर पुणे पोलीस आयुक्तांनी या प्रकरणी कारवाईचे आदेश दिले. भारती विद्यापीठ पोलिसांनी रात्री धरपकड करत शिवसेनेच्या पाच जणांना अटक केली. पहाटे पाच वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती. 


विनाकारण शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये:  डॉ.नीलम गोऱ्हे


पुण्यात शिवसेनेची कात्रजमध्ये सभा झाली. त्या सभेनंतर परतत असताना काही व्यक्तींनी माजी मंत्री उदय सामंत यांच्या गाडीचा काच फोडून हल्ला करण्याचा प्रयत्न केला असे दिसून येत आहे. हल्ला करणारे नेमके कोण आहेत, हे जोपर्यंत स्पष्ट होत नही, तोपर्यंत ते शिवसैनिकच आहेत, असे गृहित धरणे चुकीचे असल्याचे शिवसेना उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.