Ravindra Dhangekar : माझ्या झालेल्या विजयामुळे भाजपचे डोळे उघडले आहेत. म्हणून भाजप आता जनतेचे कामे करताना दिसत आहेत, असा हल्लाबोल काँग्रेस पक्षाचे कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी केला आहे. आमदार झाल्यानंतर आणि शपथविधीनंतर त्यांनी पहिलीच पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. 


मागील अनेक वर्षापासुन पुणे शहरातील नागरिकांना मिळकत करात सवलत मिळावी, यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत होतो. या प्रयत्नांना यश आलं आहे. काल मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन त्यासंदर्भातील निर्णय घेतला आहे.  त्यामध्ये शहरातील मिळकतकरात 40 टक्के सवलत देण्याची घोषणा केली आहे, असं ते म्हणाले. यासंदर्भात आम्हीदेखील अनेक आंदोलनं केली आहेत. मी आधी देखील सांगितल होत की आशिया खंडात सगळ्यात जास्त टॅक्स घेणारी ही पालिका आहे, असंही ते म्हणाले. आता 500 स्केवर फूट घरांसाठी कर कमी करावा ही मागणी करणार असल्याचं ते म्हणाले


कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत शिंदे आणि फडणवीस यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे त्यांचे डोळे उघडले असून आता ते निर्णय घ्यायला लागले आहेत,अशा शब्दात शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. मला मत दिलं आणि निवडूण आणलं आणि जनतेची सेवा करण्याची संधी दिली, असं म्हणत त्यांनी जनतेचे आभार मानले. 


पुणे शहरात जवळपास 10 लाख मिळकती आहे. त्या सर्व मिळकतधारकांना दररोज अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून त्यांच्याकडून महापालिका प्रशासन मिळकतकर वसुली करीत होती. त्यामुळे मिळकतकरात सवलत मिळाली पाहिजे अशी मागणी महापालिकेच्या सभागृहात नगरसेवक म्हणून आजपर्यंत मांडली. त्यामुळे आज आमदार म्हणून विधिमंडळात हीच मागणी केली. त्या मागणीला यश आलं असल्याचं ते म्हणाले. 


मुंबईत 500 फुटाच्या घरांना सवलत


मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी मिळाल्यानंतर त्या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. आता मुंबई महापालिकेने ज्या प्रकारे 500 स्क्वेअर फुटाच्या घराना सवलत दिली आहे. त्यानुसार पुणे शहरातील 500 फुटाच्या घरांना देखील मुंबई महापालिके प्रमाणे सवलत देण्यात यावी. हीच मागणी विधिमंडळात करणार असून आमची मागणी मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरून आवाज उठवणार असल्याचं ते म्हणाले.



...तर न्यायालयात जाऊ!


वाड्यांच्या प्रश्नासंदर्भात मी दोन दिवसांपूर्वी बोललो होतो वेळ पडली तर न्यायालयात जाऊ.  सर्वसामान्य लोकांना न्याय मिळायला हवा, वाडे पडायला आलेत, विकास होत नाही, गरज पडली तर न्यायालायात दाद मागू, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.