मुंबई-पुणे प्रवास आता 20 मिनिटांत, हायपरलूप तंत्रज्ञान येणार
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे | 16 Nov 2017 08:59 PM (IST)
सध्या असलेल्या महामार्गांची दुरवस्था दूर करुन प्रवास सुखकर करा, अशाही प्रवाशांकडून भावना व्यक्त होत आहेत. महामार्गाचं 8 पदरीकरणही प्रलंबित आहे.
पुणे : मुंबई-पुणे प्रवास आता अवघ्या 20 मिनिटांत पार करणं शक्य होणार आहे. वाहतुकीसाठी हायपर लूप तंत्रज्ञान आणलं जाणार आहे. हायपर लूप वन आणि राज्य सरकारमध्ये यासंदर्भात करार झाला आहे. सध्या मुंबई-पुणे रस्ते वाहतूक कायम अडथळ्यांची ठरते आहे. कधी वाहतूक कोंडी, तर कधी दरड कोसळल्याने वाहतुकीत अडथळा. नाना कारणांनी मुंबई-पुणे प्रवास त्रास देणारा ठरतो. त्यामुळे हायपरलूपसारखे पर्याय नक्कीच दिलासादायक ठरतील. मात्र अशाप्रकारची अद्यायावत सुविधा प्रत्यक्षात साकारायला कधी मुहूर्त मिळेल, हा प्रश्नच आहे. दुसरीकडे, सध्या असलेल्या महामार्गांची दुरवस्था दूर करुन प्रवास सुखकर करा, अशाही प्रवाशांकडून भावना व्यक्त होत आहेत. महामार्गाचं 8 पदरीकरणही प्रलंबित आहे. हायपरलूप तंत्रज्ञान म्हणजे काय? हायपरलूप तंत्रज्ञानाचा वापर करुन हवेच्या पोकळीतून स्पीडब्रेकरशिवाय ट्रेन-मेट्रोसदृश वाहनातून प्रवास करणे शक्य होते. त्यासाठी विशिष्ट आकाराच्या आणि विशिष्ट स्वरुपाच्या ट्युबची निर्मिती करुन, त्यातील वाहनाचे डबे हे कॅप्सूलच्या असतात. तर हे डबे अशा रुळांवरुन धावतात, ज्यांना चुंबकीय तंत्रज्ञान असतं.