पुणे : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील अश्वाचं निधन झालं. 'हिरा' नावाच्या घोड्याचा आज सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला.


गेल्या आठ वर्षांपासून माऊलींच्या वारीत हा अश्व सेवा देत होता. बेळगावचे श्रीमंत उर्जितसिंह शितोळे सरकार यांचा हा अश्व होता.

आळंदी ते पुणे या 30 किलोमीटरच्या वाटचालीत या अश्वाने सेवा केली. काल रात्री माऊलींची पालखी पुण्यात दाखल झाली. मात्र आज सकाळी हृदयविकाराच्या धक्क्यानं हिराचं निधन झालं.

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज या दोन्ही पालख्या आज पुणे मुक्कामी आहेत. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी भवानी पेठेतल्या विठ्ठल मंदिरात आहे, तर तुकोबांच्या पालखीने नाना पेठेतल्या श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरात मुक्काम घेतला.

पुणे शहर आणि परिसरातून मोठ्या प्रमाणात भाविक पालखी दर्शनाला येतात. दिवसभर दोन्ही पालख्यांच्या ठिकाणी भाविकांची मांदियाळी दिसेल.

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सकाळी तुकोबांच्या पालखीचं दर्शन घेतलं. भाजप अध्यक्ष अमित शाह यांनीही पालख्यांचं दर्शन घेतलं.

दोन्ही पालख्यांचा संगम सोहळा शनिवारी पुणे शहरात पार पडला. या अद्भूत संगम सोहळ्यासाठी लाखो वारकरी उपस्थित होते.