पुणे हाय प्रोफाईल आयपीएस अधिकारी असलेले विजय रमण यांचे पुण्यातील रुग्णालयात निधन झाले. मागील काही महिन्यापासून त्यांची  कर्करोगासोबत झुंज सुरू होती. मात्र, त्यांची झुंज अपयशी ठरली. कर्करोगावर सुरू असलेल्या उपचारांना ते सकारात्मक प्रतिसाद देत होते. मात्र, त्यांची प्रकृती अचानक ढासळू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. आयपीएस अधिकारी (निवृत्त)  विजय रमण यांनी पान सिंह तोमर आणि दहशतवादी गाजीबाबा यांना चकमकीत ठार केले होते. 


रमण हे मध्य प्रदेश केडरचे 1975 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. विजय रमण यांना फेब्रुवारीमध्ये कर्करोग झाल्याचे निदान झाले होते आणि तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांच्यात सुधारणा झाल्याचे लक्षण दिसून आल्याचे पत्नी वीणा यांनी सांगितले. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने विजय रमण यांना 18 सप्टेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना पुन्हा आयसीयूमध्ये हलवण्यात आले. गुरुवारी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आली आणि कुटुंबीय त्यांना दोन-तीन दिवस घरी घेऊन जाणार होते, मात्र त्यांचे अचानक निधन झाले. अशा परिस्थितीत त्यांच्या निधनाने कुटुंबातील सर्वांनाच धक्का बसला आहे.


जेव्हा फुलन देवी यांनी रमण यांना हटवण्याची मागणी केली...


चंबळ परिसरात वास्तव्यास असलेल्या दरोडेखोर, डाकूंमध्ये विजय रमण यांची भीती होती. असं म्हणतात की, जेव्हा फुलन देवीने शरणागती पत्करली तेव्हा त्यांनी विजय रमणच्या जागी अन्य कोणाला तरी भिंडचा पोलीस अधीक्षक बनवण्याची मागणी केली होती. विजय रमण यांनी अनेक दहशतवादी आणि नक्षलविरोधी
 मोहिमांमध्ये  सहभाग घेतला होता. त्यांनी मध्य प्रदेश पोलिस, सीआरपीएफ, बीएसएफ आणि रेल्वे पोलीस दलात जबाबदारी सांभाळली होती. 


संसद हल्ल्याचा मास्टरमाईंड गाझी बाबाचा एन्काउंटर


2003 मध्ये विजय रमन हे श्रीनगरमध्ये सीमा सुरक्षा दलाचे आयजी म्हणून तैनात होते. त्यांनी 10 तासांच्या आव्हानात्मक चकमकीचे नेतृत्व केले होते.  यामध्ये संसद हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि दहशतवादी गाझी बाबा मारला गेला. त्याच वेळी, 1981 मध्ये, अॅथलीट-डाकू पानसिंग तोमरचा एन्काउंटर देखील विजय रमण यांच्या नेतृत्वाखाली झाला होता. पान सिंग तोमर विरुद्धची ही चकमक 14 तास चालली होती.