पंढरपूर : सातारा आणि पुणे जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसामुळे पंढरपुरावरील पुराचा धोका वाढला आहे. उजनी धारण 100 टक्के भरल्यावर धोका अधिक गंभीर होणार आहे. सध्या उजनी धरणात 95 टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा जमा झाला असून अजूनही मोठ्या प्रमाणात पाणी धरणात जमा होत आहे.


या परिस्थितीत सातारा जिल्ह्यातील वीर आणि भाटघर धरणेही 100 टक्के भरल्याने यातून सोडण्यात येत असलेले पाणी नीरा नरसिंगापूर येथील नीरा-भीमा संगमातून पंढरपूरकडे येत आहे. पुणे, सातारा जिल्ह्यात पाऊस असाच सुरु राहिला, तर वीरसोबत उजनी धरणातून देखील मोठ्या प्रमाणात भीमा नदीमध्ये पाणी सोडावे लागणार आहे. त्यामुळे पुराचा धोका पंढरपूरवर आहे.

श्रावण महिना असल्याने रोज शेकडो भाविक चंद्रभागेच्या तिरावर स्नानासाठी पंढरपूरला येत असतात. काल कर्नाटकाचा लेखन टोम्पे हा तरुण भाविक चंद्रभागेच्या पाण्यात वाहून गेला होता. आज सायंकाळी त्याचा मृतदेह हाती लागला आहे. त्यामुळे चंद्रेभागेचं वाढतं पाणी भाविकांसाठी धोकादायक ठरत आहे.

बेकायदा वाळू उपशाने चंद्रभागा पात्रात अनेक मोठे जीवघेणे खड्डे तयार झाले आहेत. पाणी आल्याने भाविकांना पाण्याचा नेमका अंदाज कळत नसल्याने बुडण्याच्या घटना घडत आहेत. या परिस्थितीत प्रशासन फक्त नागरिकांना सावधानतेचा इशारा देत आहे. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून चंद्रभागेवर अजुनही आपत्कालिन यंत्रणा सुरू करण्यात आलेली नाही.