पुणे : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी (Pune Crime News) घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र दिसत आहे. नुकत्याच नाना पेठेत झालेल्या टोळीयुद्धात १९ वर्षीय आयुष कोमकरची निर्दयपणे हत्या (Pune Crime News) करण्यात आली होती. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने आयुषवर गोळीबार केला होता. तब्बल १२ गोळ्या झाडल्या गेल्या असून, त्यापैकी नऊ गोळ्या आयुषला लागल्याने त्याचा जागीच मृत्यू (Pune Crime News) झाला होता. आयुष हा वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा असल्याने टोळीने सूड उगवला होता. ही घटना अद्याप ताजी असतानाच पुण्यात पुन्हा एकदा गोळीबाराचा प्रकार घडला आहे. मध्यरात्री कोथरूड परिसरात झालेल्या या गोळीबारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, कुख्यात गुंड निलेश घायवळ यांच्या टोळीकडून हा गोळीबार केला असल्याची माहिती आहे. गाडीला पुढे जाण्यास साईड न दिल्याच्या वादातून ही घटना घडल्याचं सांगितलं जातं.(Pune Crime News) 

Continues below advertisement


गाडीला साईड दिली नाही म्हणून गोळीबार


गाडीला साईड दिली नाही म्हणून पुण्यातील कोथरुड भागात गोळीबार करण्यात आला आहे. निलेश घायवळ टोळीकडून करण्यात आलेल्या गोळीबारात एकजण गंभीर जखमी झाला आहे. पुण्यातील कोथरुडमधील सह्याद्री रुग्णालयात जखमीवर उपचार सुरु आहेत‌.  घायवळ टोळीतील मुसा शेख, रोहित आखाड, गणेश राऊत आणि मयुर कुंभारे यांनी गोळीबार केल्याची माहिती आहे. मध्यरात्री कोथरुड भागात ही घटना घडलीय आहे. प्रकाश दुरगुडे असं गोळीबार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. आरोपींपैकी मयुर कुंभारेने गोळीबार केलेला आहे. तीन गोळ्या झाडल्यात. मानेला आणि मांडीला गोळी लागलीय‌.


कोथरूडच्या शिंदे चाळ परिसरातील घटना


मिळालेल्या माहितीनुसार, एका वाहनचालकाने घायवळ टोळीच्या गुंडाना पुढे जाण्यास साईड दिली नाही. याच कारणातून हे तिघे संतापले आणि त्यांनी कारमधील प्रकाश धुमाळ नावाच्या व्यक्तीवर गोळीबार केला. सुरुवातील तीन राऊंड फायर केल्याची माहिती मिळत होती. मात्र आता रात्री एकच राऊड फायरिंग केल्याचं सांगितलं जातंय. ही घटना कोथरूडच्या शिंदे चाळ परिसरात घडली. या गोळीबारात प्रकाश धुमाळ जखमी झाले असून, त्यांच्या पायाला गोळी लागली आहे. जखमीवर पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची आता प्रकृती कशी आहे, याची माहिती अद्याप समोर आली नाही. मात्र एकीकडे आंदेकर टोळीने केलेल्या गोळीबाराची घटना ताजी असताना आता घायवळ टोळीने गोळीबार केल्याने पुणेकरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.