पुणे : पुण्यातील देवाची उरळी येथे आज पहाटे साडीच्या सेंटरला लागलेल्या आगीत पाच कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या तर खाजगी दहा टँकरच्या मदतीने तीन तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.
पुण्यातील उरुळी देवाची येथील राजयोग साडी डेपो या होलसेलच्या सात हजार स्क्वेअर फूट जागवेरील दुकानाला पहाटे चार वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत कामगारांचा होरपळून आणि गुदमरून दुकानात झोपलेल्या मृत्यू झाला. राकेश रियाड (25), राकेश मेघवाल (वय 25), धर्मराम वाडीयासार (वय 25), सुरज शर्मा (वय 25) आणि धीरज चांडक (वय 23) अशी मृत्युमुखी पडलेल्या कामगारांची नावे आहेत.


या आगीत अंदाजे 3 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मृत्युमुखी पडलेले कामगार काम झाल्यानंतर दुकानातच झोपतात. त्यानंतर दुकानाला बाहेरून कुलूप लावले जाते. गुरुवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास आग लागल्यानंतर एका कामगाराने दुकान मॅनेजरला फोन करून आग लागल्याची माहिती दिली.


तसेच आगीमुळे आम्हाला गुदमरत असून बाहेर पडता येत नसल्याचे सांगितले. यानंतर मॅनेजर दुकानाजवळ आला परंतु तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. कुलुप काढताच आत सगळे कपडे असल्याने आगीची लोळ बाहेर पडले.


दरम्यान घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी  शर्थीचे प्रयत्न करीत साडेतीन तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र यातील कामगारांना वाचवता आले नाही. दुकानाच्या पाठीमागील भिंतींना भगदाड पाडून सकाळी सात वाजण्याच्या सुमारास या सर्वांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. या कामगारांनी खिडक्यांच्या काचा वाकवून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पण त्यांना बाहेर पडता आले नाही. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या आणि दहा टँकरने ही आग विझवली.

भवरलाल प्रजापती असं दुकान मालकाचं नाव असून भागीदारीत राजयोग साडी सेंटर चालवतं जातं.