पुणे : राज्यात कोरोना विषाणुंच्या वाढत्या प्रसाराला रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व गोष्टी बंद ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. तर करोनाच्या भीतीने पुण्यात अघोषित संचारबंदी लागू झाली आहे. एकीकडे सरकार आवाहन करतंय की गर्दी टाळा, घरीच थांबा. पण पुणे स्टेशन वर मात्र भयावह चित्र दिसत आहे. नागरिक मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष केले आहे. कोरोनाच्या धास्तीनं महानगरातून गावाला जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. आज पुणे रेल्वस्टेशनवर नागरिकांनी तिकीट काढण्यासाठी दिवसभर मोठी गर्दी केली पाहायला मिळाली. नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.


पुणे आणि पिंपरी या भागात करोनाचे 21 रुग्ण आढळले. पुण्यात बाहेरच्या देशातून येणाऱ्या लोकांचीही संख्या जास्त आहे. पुण्याहून बंगाल, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये जाणाऱ्या रेल्वेवर प्रंचड गर्दी आहे. यामध्ये पुण्यात हॉटेलमध्ये, दुकांनमध्ये काम करणाऱ्या कामगारांची संख्या जास्त आहे. दुकानं बंद, त्यात कोरोनाची भीती यामुळे हे सगळे त्यांच्या गावी जाण्यासाठी गर्दी करत आहेत. दुकान मालकाकडून कुठलीही रजा किंवा सुविधा त्यांना मिळाल्या नसल्यामुळे मिळेल त्या गाडीने घरी जात आहेत. पुण्याहून बंगाल, उत्तर प्रदेश बिहारकडे जाणाऱ्या काही स्पेशल ट्रेन सोडण्यात आल्या आहेत. पण तरीही गर्दी कमी होताना दिसत नाही आहे. पटण्याला जाणाऱ्या रात्री 9च्या गाडीसाठी दुपारी 12 वाजल्यापासून रांग आहे. यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून गर्दी टाळा हे सांगण्यासाठीचं आवाहन स्टेशनवर जमलेले लोक पूर्णपणे विसरले आहेत. त्यामुळे उलट ही गर्दी कोरोना विषाणूची वाहक तर ठरणार नाही ना? असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

दरम्यान राज्यात कोरोना विषाणुंच्या वाढत्या प्रसाराला रोखण्यासाठी राज्यातील सर्व शासकीय कार्यालयातील उपस्थिती आता फक्त 25 टक्क्यांवर आणण्यात आली आहे, तसंच मेडिकल, अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व प्रकारची दुकाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (20 मार्च) जाहीर केलं. रेल्वे, बस बंद केल्या तर अत्यावश्यक सेवा खोळंबतील. त्यामुळे तूर्तास रेल्वे आणि बस सेवा बंद होणार नाही, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं. तर जीवनावश्यक क्षेत्रासाठी काम करत असलेली खाजगी कार्यालये वगळून अन्य सर्व कार्यालयेही बंद करण्याचे आदेश देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. खाजगी कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांचं या काळातील सुट्टीचं वेतन कापू नये, असं आवाहनही त्यांनी केलं. फेसबुक लाईव्हवरुन राज्याला उद्देशून संवाद साधला, त्यात त्यांनी ही घोषणा केला.



जनता कर्फ्यू दरम्यान साडेतीन हजाराहून अधिक रेल्वे गाड्या रद्द

22 तारखेला म्हणजेच रविवारी जनता कर्फ्यू दरम्यान पहाटे 4 वाजल्यापासून रात्री 10 पर्यंत रेल्वे बंद ठेवण्यात येणार आहेत. देशभरात साडेतीन हजाराहून अधिक रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे. रविवारी 2400 पॅसेंजर, 1300 मेल रद्द करण्यात आल्या आहेत. यात लोकल, पॅसेंजर, मेल, एक्सप्रेस, इंटरसिटी आदी रेल्वे गाड्यांचा समावेश आहे तसेच लोकलच्या फेऱ्या देखील मोठ्या प्रमाणावर कमी करण्यात येणार आहेत. महाराष्ट्रापुरतं बोलायचं झाल्यास मुंबई, पुणे, नाशिकसह इतर मह्त्वाच्या रेल्वे स्थानकावरुन सुटणाऱ्या रेल्वे रद्द असतील. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना रेल्वे स्थानकावर थांबण्यास परवानगी मिळू शकते. तसेच तिकीट रद्द होणार असल्यामुळे प्रवाशांना पैसे परत मिळणार आहे. मोठ्या स्थानकावर बिकट परिस्थिती उद्भवल्यास विशेष रेल्वे चालवून गर्दी कमी करण्याची तयारी प्रशासनकडून करण्यात आल्याची माहिती मिळते आहे.