CM Eknath Shinde Threat Call : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना धमकी देणारा फोन (Threat Call) डायल 112 ला प्राप्त झाला आहे. 'मी एकनाथ शिंदे यांना उडवणार आहे' असं बोलून कॉलरने कॉल कट केला. पुण्यातील (Pune) वारजे इथून हा कॉल आल्याचं लोकेशनद्वारे स्पष्ट झालं आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांना धमकीचा कॉल करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 


नागपूरमधील डायल 112 च्या कंट्रोल रुममध्ये कॉल


सोमवारी (10 एप्रिल) रात्री डायर 112 वर फोन आला ज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. "मी एकनाथ शिंदे यांना उडवणार आहे" असं बोलून कॉलरने कॉल कट केला. डायल 112 चं कंट्रोल रुम नागपूरमध्ये आहे, तिथेच हा कॉल आला होता.


पोलिसांकडून एक जण ताब्यात 


या कॉलनंतर पोलीस सतर्क झाले. कॉल कुठून आला होता याचं लोकेशन त्यांनी ट्रेस केलं. पोलिसांना मिळालेल्या लोकेशननुसार कॉल पुण्यातील वारजे इथून आला होता. त्यानंतर पोलीस या ठिकाणी पोहोचले आणि एका व्यक्तीला ताब्यात घेतलं.


दारुच्या नशेत मुख्यमंत्र्यांना धमकीचा फोन


खरतंर हा व्यक्ती दारुच्या नशेत होता. पहिल्यांदा त्याने अॅम्ब्युलन्ससाठी कॉल होता. पण अॅम्ब्युलन्स आली नाही म्हणून त्याने डायल 112 कॉल करुन थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उडवून टाकण्याची धमकी दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरु आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी नशेखोर आहे. नशेत त्याने मुख्यमंत्र्यांना धमकी दिली.


मुंबईत दहशतवादी आल्याचा कॉल


दरम्यान चार दिवसांपूर्वीच मुंबईमध्ये तीन दहशतवादी (Terrorists) आल्याची माहिती देणारा फोन कॉल मुंबई पोलीस (Mumbai Police) नियंत्रण कक्षात आला होता. दुबईवरुन शुक्रवारी (7 एप्रिल) पहाटे तीन अतिरेकी मुंबईत आल्याचं आणि त्यांचा संबंध पाकिस्तानशी असल्याचा कॉलरने दावा केला होता. या फोन कॉलनंतर मुंबई पोलिसांनी पुढील तपास सुरु केला.


काय आहे डायल 112?


नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत सर्व मदत एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी, म्हणून 112 हा क्रमांक राज्यात कार्यान्वित करण्यात आला आहे. '112' क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर तो कॉल कुठून करण्यात आला आहे, हे समजते. त्यामुळे संबंधिताला त्वरित मदत देण्याची कार्यवाही केली जाते. पोलीस, अग्निशमन, आरोग्य मदत, महिला, मुले आणि ज्येष्ठ नागरिक यासारख्या सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळाव्यात, यासाठी केंद्र सरकारने देशभरासाठी '112' हा एकच क्रमांक कार्यान्वित केला. तर महाराष्ट्रात 2021 मध्ये हा क्रमांक कार्यान्वित झाला. 


हेही वाचा


Mumbai Threat Call : मुंबईत तीन अतिरेकी, मुंबई पोलीस नियंत्रण कक्षात फोन; पोलीस यंत्रणा अलर्ट