पुणे : गिरीश बापट यांच्या सरकार बदलेल वक्तव्यावरून पुण्यात बापट विरुद्ध काकडे वाद पुन्हा समोर आला आहे.


‘पुढच्या वर्षी सरकार बदलेल’, असं वक्तव्य अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी केलं होतं. त्यासाठी त्यांच्यावर काय कारवाई करायची याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यावा.’ अशी मागणी भाजप खासदार संजय काकडे यांनी केली आहे.

दरम्यान, 2019 पर्यंत सरकारला कोणताही धोका नसल्याचं वक्तव्य यावेळी संजय काकडेंनी केलं आहे. 'शिवसेना आणि आमचे इतके वाईट संबंध झालेले नाही की ते आमचा पाठिंबा काढून घेतील. तसंच 2019च्या लोकसभेत शिवसेनेनं आमच्यासोबत युती केल्यास आश्चर्य वाटून घेऊ नये. 2019ला राज्यात भाजपची एकहाती सत्ता येईल. आमच्या 170 ते 185 जागा येतील असा मला विश्वास आहे.' असंही ते यावेळी म्हणाले.

गुजरात निवडणुकीवेळी भाजपची हार होईल असं भाकित संजय काकडेंनी केलं होतं. त्यावर गिरीश बापट यांच्या समर्थकांनी काकडेंवर कारवाईची मागणी केली होती.

गिरीश बापट वास्तवाची जाण असणारा नेता: सुप्रिया सुळे

दरम्यान दुसरीकडे याचप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गिरीश बापटांना टोला लगावला आहे. ‘“गिरीश बापटांच्या वक्तव्याचं मी मनापासून स्वागत करते. वास्तवाची जाणीव भाजपमध्ये कोणत्या नेत्यामध्ये असेल, तर ती माननीय, आदरणीय बापटसाहेबांकडे आहे. त्यामुळे त्यांनी वास्तव लक्षात घेऊन ते बोललेले आहेत. त्यामुळे त्यांचं मी मनापासून स्वागत करते.” असं त्या म्हणाल्या.

गिरीश बापट काय म्हणाले होते?

‘वर्षभरानंतर सरकार बदलणार आहे. त्यामुळे जे काही मागायचं आहे, ते आत्ताच मागून घ्या. पुढं काय होईल काय नाही याची चर्चा मी इथे करत नाही. पण पुढे काय होणार आहे हे मला माहिती आहे. कोणाचंही सरकार असो. शेतकऱ्यांना मदत करणं हे त्यांचं आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे जे काही मागायचं असेल, ते आत्ताच मागून घ्या’, असं गिरीश बापट म्हणाले होते.

अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संशोधन संघाचे राष्ट्रीय अधिवेशन आणि राष्ट्रीय डाळिंब परिषद पुण्यात संपन्न झाली. त्यावेळी बापट बोलत होते.

डाळिंब उत्पादकांनी काही मागण्या गिरीश बापटांकडे केल्या होत्या. त्यावर बोलण्याच्या ओघात बापटांनी पुढील सरकार बद्दल हे वक्तव्य केलं होतं.

संबंधित बातमी :

वर्षभरानंतर सरकार बदलणार, गिरीश बापटांचं खळबळजनक वक्तव्य