पुणे : सतीश शेट्टी हत्या प्रकरणी सीबीआयने आयआरबी कंपनी आणि कंपनीचे प्रमुख वीरेंद्र म्हैसकर यांना क्लीन चिट दिली आहे.
शेट्टी हत्या प्रकरणाचा तपास करताना कोणताही नवीन पुरावा मिळालेला नाही आणि आयआरबीचा या प्रकरणाशी संबंधही आढळून आलेला नाही, असं सीबीआयने न्यायालयात दाखल केलेल्या अहवालात म्हटलं.


आयआरबी कंपनीने नॅशनल स्टॉक एक्स्चेंजकडे सीबीआयचा अहवाल सादर केला. त्याचबरोबर शेअर होल्डर्सनाही त्याची माहिती दिली.

आयआरबीचे कार्यकारी संचालक वीरेंद्र म्हैसकर हे सतीश शेट्टी हत्या प्रकरणातील आरोपी आहेत. मात्र न्यायालयात खटला सुरु असतानाच सीबीआयने त्यांना निर्दोष जाहीर केलं.

2010 मध्ये सतीश शेट्टींची तळेगाव दाभाडेत हत्या करण्यात आली होती. मात्र सुरुवातीपासूनच या प्रकरणात तपास यंत्रणांची भूमिका संशयास्पद राहिली आहे. या प्रकरणात आधी तपास अधिकारी असलेल्या तत्कालीन पोलिस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकरच पुढे या प्रकरणात आरोपी झाला आणि काही महिने येरवडा कारागृहात होता.

या प्रकरणात सीबीआयने 2014 मध्ये वडगाव मावळ न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. मात्र 2015 मध्ये पुन्हा या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला. सतीश शेट्टींचा भाऊ संदीप शेट्टी यांनी सीबीआयने दिलेली ही क्लीन चिट राजकीय दबावामुळे दिल्याचं म्हटलं आहे.