मावळ तालुक्यातील पवनानगर-आपटी पूल वाहून गेला
एबीपी माझा वेब टीम | 05 Aug 2016 06:28 PM (IST)
पुणे: मावळ तालुक्यातील पवनानगरकडून आपटी आणि गेवेंडे या गावाकडे जाणाऱ्या मार्गावरील पूल वाहून गेला आहे. ओढ्याच्या पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने पूल उखडला आहे. यात आपटी आणि गेवंडे या दोन्ही गावांचा संपर्क तुटला आहे. याच परिसरात आलेल्या पर्यटक सुरक्षित असून त्यांची वाहनेदेखील यामुळे अडकली आहेत. उद्याच या पुलाचे काम हाती घेणार असल्याचं मावळचे तहसीलदार शरद पाटील यांची माहिती. गेल्या ३ ते ४ दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने त्याचा फटका मावळ तालुक्याला बसला आहे. सकाळीच या भागातील दोन पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. पण आपटी गेवेंडीकडे जाणारा पूल पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेला आहे. मात्र, संततधार पावसाने पवना धरणाच्या पाणीपातळीतही झपाट्याने वाढ होत असून धरणातूनही पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे. त्यामुळे आसपासच्या परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.