पुणे : आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांचं निधन झालं आहे. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.  त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.  बालाजी तांबे यांनी आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसारासाठी मोठं कार्य केलं. बालाजी तांबे यांनी आयुर्वेदिक औषधी शास्त्र आणि आयुर्वेदिक फिजिओथेरपी यावर संशोधन केले आहे. बालाजी तांबे यांनी मेकॅनिकल इंजिनीअरचीही डिग्री घेतली होती. 


लोणावळ्याजवळील कार्ला येथील ‘आत्मसंतूलन व्हिलेज’ या प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांनी आयुर्वेदाच्या माध्यमातून लोकांची सेवा केली. अनेक आजारांवर आयुर्वेदाच्या माध्यमातून त्यांनी उपचार केले. विविध आयुर्वेदिक औषधांची संशोधन करुन त्यांनी निर्मितीही केली. त्यांच्या देशभरातूनच नव्हे तर परदेशातूनही रुग्ण उपचारासाठी येत असत. 


माझा कट्टा : मेकॅनिकल इंजिनीअर ते आयुर्वेदाचार्य... डॉ. बालाजी तांबे यांचा प्रवास


काही दिवसांपूर्वीच बालाजी तांबे हे एबीपी माझाच्या प्रसिद्ध अशा माझा कट्टा या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी अनेक किस्से एबीपी माझाच्या प्रेक्षकांसोबत शेअर केले होते. मोठ्या कष्टाने त्यांनी ‘आत्मसंतूलन व्हिलेज’ निर्मिती केली होती. जागा खरेदी करण्यासाठी पत्नीचे दागिने गहाण ठेवले होते. दागिने गहाण ठेऊन जागा विकत घेतली मात्र तेथे पूर्ण बांधकाम करण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळे सुरुवातीला येणाऱ्या रुग्णांसाठी एमटीडीसीचे बंगले भाड्याने त्यांनी घेतले होते. त्यानंतर हळूहळू मिळणाऱ्या पैशातून आश्रमाची उभारणी केली, अशी माहिती डॉ. बालाजी तांबे यांनी दिली होती. 


आयुर्वेद, योग शिक्षणातून पिढी घडवणारा आरोग्यपूजक, मुख्यमंत्र्यांची डॉ. बालाजी तांबे यांना श्रद्धांजली


आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. डॉ. तांबे यांच्या निधनामुळे आयुर्वेद आणि रोजच्या जगण्यात आहार-विहार आणि विचारांच्या संतुलनाबाबत मार्गदर्शन करणारे आरोग्यपूजक व्यक्तिमत्व काळाने हिरावून नेले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, आयुर्वेद आणि योगाच्या माध्यमातून अनेकांच्या जीवनात आरोग्यदायी बदल घडवण्याचा डॉ. बालाजी तांबे यांनी ध्यास घेतला होता. त्यांची दर्जेदार औषध निर्मितीतून त्यांनी आयुर्वेदाचा देश, विदेशातही प्रसार केला. आहार, विहार आणि विचार यांच्या संतुलनातच आरोग्याची गुरुकिल्ली आहे, हा संदेश त्यांनी सहज, सोप्या आणि ओघवत्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहचवला. अध्यात्माची आणि आरोग्याची सांगड घालण्यामुळे अनेकांनी त्यांना आपल्या जीवनात गुरूचे स्थान दिले. आयुर्वेदाबाबतचा डोळस दृष्टीकोन निर्माण करण्यात आणि नव्या पिढीत त्याबाबतची गोडी निर्माण करण्यात डॉ. तांबे यांचे मोलाचे योगदान राहीले आहे. त्यांचे हे योगदान सदैव स्मरणात राहील. आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.