पुणे: पुणे शहर (Pune Rain) परिसरात पावसामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. शहराच्या सखल भागात पाणी साचून ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं आहे. एनडीआरएफकडून मदत आणि बचावकार्य सुरु आहे. प्रशासनाच्या वतीने नागरिकांना सर्तकतेचे आवाहन करण्यात आले आहे. गरज नसल्यास घराबाहेर पडू नका असंही प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. पुणे महानगरपालिका हद्दीत एकता नगरी सिंहगड रोड वरील द्वारका सोसायटी, शरदा सरोवर सोसायटी, शाम सुंदर सोसायटी, निंबजनगर परिसरातील सोसायटी, सिंहगड रोड, घरकुल सोसायटी पिंपरी चिंचवड, वृंदावन आश्रम आकुर्डी विशालनगर, जगताप डेअरी विणस सोसायटी, कुंदननगर या गृह निर्माण हाउसिंग सोसायटी मध्ये पावसाचे पाणी (Pune Rain) शिरले आहे. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. दरम्यान पुणे शहर परिसरात पुरस्थिती का निर्माण झाली याबाबत उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. 


आज अजित पवारांनी (Ajit Pawar) पुण्यातील पुरस्थितीचा आढावा घेतला आहे. अजित पवार (Ajit Pawar) पुण्यातील आपत्ती व्यवस्थापन विभागात दाखल झाले. त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा देखील केली. अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत याबाबतची माहिती दिली. यवेळी बोलताना अजित पवार म्हणाले, काही ठिकाणी ओढे,नाले बुजवण्यात आलेले आहे, चुकीच्या पद्धतीने बांधकामे करण्यात आलेली आहे. ते देखील पुर परिस्थितीला कारणीभूत आहे. नदी सुशोभीकरण प्रकल्पाच्या कामांचा आणि या परिस्थितीचा काहीही संबंध नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे. 


यावेळी अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, मुंबई, पालघर, रत्नागिरी आणि खासकरून पुण्यात परिस्थिती गंभी आहे. आम्ही विदर्भातील चंद्रपूर आणि इतर ठिकाणी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. सध्या अलमट्टी धरणातून अडीच लाख क्सुसेक्सने विसर्ग होत आहे. तो तीन लाख क्युसेक्सने वाढविण्यासाठी कर्नाटक सरकारला विनंती करण्यात आली आहे. तर पुण्यातील खडकवासला धरणातून पाणी सोडायचे असल्यास आधीच सोडा, अंधार पडल्यानंतर नको असे जलसंपदा विभागाला सांगितले आहे. एकता नगरमध्ये आर्मीचे १०० जवान तैनात करण्यात आले आहेत, त्याचबरोबर एनडीआरएफचे जवान देखील तैनात करण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यातील (Pune Rain) सर्व पाणी उपसा योजना सुरू करण्यास सांगण्यात आलं आहे. जेणेकरून पाण्याच्या विसर्ग मोठ्या प्रमाणात होईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.


पुणे जिल्ह्यातील (Pune Rain) पर्यटनस्थळे दोन दिवस बंद करण्यात आली आहेत. लवासाच्या आतमध्ये मोठ्या प्रमाणात दरड कोसळली आहे. तीन बंगल्यावर दरड कोसळुन लोक अडकले असण्याची शक्यता आहे. तिथे मदत पोहचवण्याचा प्रयत्न आहे. तिघांचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. मात्र महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून आम्ही माहिती घेतली असता महावितरणकडून आधीच वीजपुरवठा बंद करण्यात आला होता असं सांगण्यात आलं आहे. अंडाभूर्जीची गाडी चालवणाऱ्या या तीन तरुणांकडून कदाचित अनधिकृत वीज कनेक्शन घेण्यात आले होते किंवा आकडा टाकून वीज घेण्यात आले होते, अशी शक्यता त्यांनी यावेळी वर्तवली आहे.


...म्हणून इतकी भयानक परिस्थिती झाली- अजित पवार


खडकवासला धरण हे अवघं पावणेतीन टीएमसीचं आहे. परंतु वरच्या भागातच आठ इंचापेक्षा जास्त पाऊस पडल्यामुळे एकदम तीन टीएमसी पाणी धरणात आलं. आम्ही एक कटाक्षाने बघितलं की, रातोरात धरणाचं पाणी सोडायच्या ऐवजी पहाटे धरणाचं पाणी सोडण्याचा प्रयत्न आम्ही केला,जेणेकरुन नागरिकांना सोयीचं व्हावं, असं अजित पवार म्हणाले. शाळांना ताबडतोब सुट्टी देण्यात आली. पुण्यात सकल भागात पाणी साचलेलं आहे. सगळीकडेच पाऊस पडल्यामुळे नदीची पाणी वाहून नेण्याची जी क्षमता आहे. त्यामध्ये नदीच्या दोन्ही बाजूने येणारं पाणी आणि ओढा-नाल्यांमधून येणार पाणी, यामुळे अनेक भागात पाणी साचलं आहे, अशी माहिती अजित पवारांनी दिली. माझ्याकडे साधारण पाच दिवसाचा म्हणजे 24 तारखेचा 25 तारखेचा 26 तारखेचा 27 तारखेचा 28 तारखेचा अशा पद्धतीचा अंदाज आहे. त्याच्यात काही ठिकाणी काल तर रेड अलर्ट होता ऑरेंज अलर्ट होता. पुणेसातारारत्नागिरी, रायगड जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट आहे. पालघर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे, अशी माहिती अजित पवारांनी दिली.