शिरुर (जि. पुणे) : आपला वेगळा फाटा आहे त्यांचा वेगळा फाटा आहे. आजही लोकांच्या मनात शंका आहे. बरेच जण म्हणतात हे परत एकत्र येतील की काय? अरे बाबांनो आता आमच्यात फाटलं आहे. उगीच मनात काही शंका ठेऊ नका. आता त्यावेळी मी सांगितलं म्हणून तुम्ही अमोल कोल्हे यांना निवडून दिलं, पण आता तो बाबा काही दिवसांनी राजीनामा द्यायचं म्हणाले. मी अभिनेता आहे, मला मतदारांना वेळ देता येईना. माझ्या क्षेत्रात माझं नुकसान व्हायला लागलं. मुळात कोल्हे यांचं राजकारण हे पिंड नाहीच. आम्हाला उमेदवार मिळाला नाही की आम्ही कलाकार पुढं आणतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अमोल कोल्हे यांची खिल्ली उडवली.
लोकसभेसाठी माणसातला माणूस उभा करणार आहे. तुम्ही एकदिलाने काम करा आणि त्या उमेदवाराला निवडून द्या, असे आवाहनही त्यांनी केले.
डॉक्टर आधी राजीनामा द्यायचं म्हणत होते
ते म्हणाले की, राजेश खन्ना, शत्रुघ्न सिन्हा, हेमा मालिनी, गोविंदा, अगदी अमिताभ बच्चनही निवडून आले अन मग राजीनामा दिला, पण त्यांना मतदारांचे काही पडलेलं नसतं. आपण राजबिंडा पाहून निवडून देतो. त्यात आमची चूक आहेच. मध्ये शिवनेरीवर मला खासदार भेटले. मी म्हटलं का ओ डॉक्टर आधी राजीनामा द्यायचं म्हणत होते, आता परत दंड थोपटले. हो, दादा आता परत लढायची इच्छा झाली. शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थित शेतकरी मेळावा झाला. या मेळाव्यादरम्यान अजित पवारांना पाठबळ देण्यासाठी शेतकरी मेळाव्यातून गावोगावच्या सरपंच, सदस्य, सोसायटी चेअरमन अशा अनेकांना पक्षप्रवेश दिला जात आहे.
आमदार अजित पवार यांनी अशोक चव्हाण यांच्यावरही टीका केली, ते म्हणाले की, घोडगंगा कारखाना चालवायला जमत नसेल तर त्यांनी स्पष्ट सांगावं. मी त्यांना तसं आवाहन करतो. त्यांनी सांगावं आपण नवी बॉडी आणू. वाटलं तर प्रशासक आणू. कारखाना चांगला चालायला हवा, शेतकऱ्यांची पिळवणूक होऊ नये. तुमचा कारखाना संकटातून बाहेर येऊ शकतो. फक्त तुम्ही साथ द्या. आत्ताचा आमदार असं वेड वाकडं वागेल असं वाटलं नव्हतं. तुमच्या आमदाराने खासगी कारखाना व्यवस्थित चालवला, पण तुमच्या हक्काच्या कारखान्याची माती केली. तुम्ही म्हणाल, आता काय बोलताय, आधी मतं तुम्हीच द्यायला लावली. अरे हो की बाबा झाली चूक, मला काय माहित हा दिवटा असा उजेड पाडेल, अशी टीका त्यांनी केली.
मी शेतकरी आहे. त्यामुळं पोल्ट्री, फळबाग, भाजीपाला अशा प्रकारची शेती मी करतो. वेळ मिळेल तेंव्हा मी शेतात जातो. मात्र कामाच्या व्यापाने मला तिथं जाता येत नाही. पण त्या अनुभवातून मला शेतकऱ्यांच्या समस्या समजलेल्या आहेत, त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या