पिंपरी-चिंचवड : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला कोणत्या मूठभर व्यक्तींनी विरोध केला होता, पूर्वी हे भाजपावाले कधी महाराजांबद्दल चांगलं बोललेलं ऐकलंय का? महाराजांचा खरा इतिहास जनतेसमोर येऊ नये यासाठी काहींनी प्रयत्न केला.”, अशी टीका अजित पवार यांनी केली. शिवाय, “भाजपाने आत्ताच कशी काय आठवण काढली?, असा प्रश्न स्वतः शिवाजी महाराजांना पडला असेल”, असे म्हणत अजित पवारांनी भाजपवर निशाणा साधला.


पिंपरी चिंचवडमध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. “आरक्षणाचा मुद्द्यावरून कोंडीत अडकलेल्या सरकारने नोटाबंदीचा निर्णय आणला, तर आता नोटाबंदीवरुन टार्गेट होत असल्याचं दिसताच साडे तीन हजार कोटींचं शिवस्मारकाच्या भूमिपूजनाची घोषणा केली” असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अजित पवार यांनी टीका केली.

“मी काय साधू संत नाही. घशाला कोरड पडेपर्यंत मी बोलतो. ना चहा, ना पाणी. प्रवचन, कीर्तन करणारे पाकीट तरी घेऊन जातात. मला कुठं काय मिळतंय? जनतेकडं लक्ष द्यायचं असेल तर त्यांनी घडाळ्यासमोरील बटन दाबावं तेंव्हा मी लक्ष घालेन ना?” अशी कोपरखळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोस्टरबाजी करून जनतेचे प्रश्न सोडविणाऱ्यांवर टीका करताना मारली.