बारामती: सध्या जग सर्व गोष्टींमध्ये अधुनिकता आणण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. असे प्रयोग शेतीमध्ये देखील केले जात आहेत. काही प्रयोग यशस्वी झाल्याचंही चित्र आहे. 'एआय'चा शेतीमध्ये वापर करून ऊसाचे आता एकरी 104 ते 150 टनापर्यंत उत्पादन घेता येत आहे. बारामतीच्या अग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (आर्टिफिशएल इंटेलिजन्स) प्रभावी वापराचा देशातील पहिलाच करण्यात आलेला प्रयोग यशस्वी झाला आहे. या प्रयोगामुळे ऊस उत्पादन 40 टक्क्यांपर्यंत वाढले आहे, याशिवाय त्यासाठी लागणारा खर्च आणि पाण्यातही सुमारे 30 टक्क्यांची बचत झाली आहे. कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावरील पहिल्या टप्प्यातील विविध वाणांच्या तीन प्लॉटवरील ऊस तोडणी पूर्ण झाली असून, त्यातून एकरी 104 ते 150 टनांपर्यंतचे उत्पादन मिळाले आहे.
बारामतीच्या अॅग्रिकल्चरल डेव्हलमेंट ट्रस्टने मायक्रोसॉफ्ट कंपनी आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सहकार्यने हा प्रयोग केला आहे. या प्रयोगासाठी राष्ट्रवादी काँग्रेस नेते शरद पवार, अॅग्रिकल्वरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे विश्वस्त प्रतापराव पवार यांनी पुढाकार घेतला होता. मागील वर्षीं कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केलेला आणि पारंपरिक शेती पद्धतीने ऊस लागवड केलेला असे दोन स्वतंत्र प्लॉट तयार करण्यात आले होते. यामध्ये उसाच्या काही वेगवेगळ्या वाणांची लागवड करण्यात आली होती, त्यामध्ये सीओ 86032, सीओ एम 265, एमएस 10001, पोडोएन 15012, सीओ व्हिएसआय 8005 आणि सीओ व्हिएसआय 18121 या सहा प्रकारच्या वाणांची लागवड करण्यात आली होती. या लागवड केलेल्या वाणांपैकी सीओ एम 265, पीडोएन 15012 आणि सीओ व्हिएसआय 8005 या तीन वाणांची तोडणी पूर्ण झाली आहे. त्यातून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे आणि पारंपरिक पद्धतीच्या दोन्ही उसांची उत्पादकता, खर्च, पाण्याचा वापर याचे निष्कर्ष काढण्यात आले आहेत, या निष्कर्षांच्या आधारे हा प्रयोग यशस्वी झाल्याचे दाखवून देत आहेत.
'एआय'चे निष्कर्ष काय आहेत?
पहिल्या टप्प्यात ऊस तोडणी झालेल्या तीन वाणांपैकी सीओ एम 265 या वाणाचे एकरी उत्पादन 150.10 टन, पीडीएन 15012 या वाणाचे 120.40 टन आणि सीओ व्हिएसआय 8005 या वाणाचे 104.78 टन उत्पादन मिळाले, या वाणांच्या उत्पादकतेमध्ये जवळपास 40 टक्क्यांहून अधिक आहे. त्याशिवाय 'एआय' तंत्राच्या वापरातून 265 या उसाची उंची 24.1 फूट आणि वजन प्रति ऊस 4.56 किलोपर्यंत मिळाले. जे की पारंपरिक पद्धतीच्या ऊसात या वाणाची उंची 18.6 एवढी राहिली, तर वजन 2.5 फुटापर्यंत मिळाले आहे. 'एआय'च्या वापरामुळे नेमकी गरजे इतकीत खते मिळाल्याने जमिनीचा सेंद्रिय कस देखील टिकून राहिला. एआय'च्या प्लॉटमधील सेंद्रिय कर्ब 1.0 टक्के मिळाला, तर पारंपरिक लागवडीच्या क्षेत्रात तो 0.68 टक्के एवढाच राहिला. तर खर्चही 30 टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. येत्या काही दिवसांमध्ये उर्वरित तीन प्लॉटवरील ऊसतोडणी पूर्ण केली जाणार आहे.
एआय' करते तरी काय ?
- एआयच्या माध्यमातून वेदर स्टेशनच्या सेन्सरहारे आणि सॅटेलाइट मैप अधारे शेतीतील पिकांचे मॉनिटरिंग केले जाते.
- शेतीमधील माती, जमिनीची, खतांची माहिती, वातावरण बदलाची माहिती आणि उसाला नेमकी गरज काय आहे, याची नेमकी माहिती त्यातून मिळते, या वेदर स्टेशनमध्ये जवळपास 12 प्रकारचे पॅरामीटर्स आहेत, त्यात झाडाच्या मुळाजवळ 7 इंचांवर प्रायमरी सॉइल मॉइश्चर आणि सेकंड सॉइल मॉइश्चर असे दोन सेन्सर बसवले आहेत, ते हे सर्व कार्य करतात.
- त्यातूनच मग जमिनीचा ओलावा, तापमान आणि बदल याची माहिती मिळते. तसेच महत्त्वाची बाब म्हणजे या संपूर्ण पिकाचे सैटेलाइटद्वारे मॉनिटरिंग केले जाते आणि त्याबाबतचे अलर्टही सातत्याने शेतकऱ्यांना त्यांच्याकडील अॅपवर मिळतात.
एक हजार शेतकऱ्यांच्या शेतावर प्रयोग
एआय'च्या माध्यमातून करण्यात आलेल्या प्रयोगामुळे शेतकऱ्यांना उत्पादनातील शाश्वतता वाढली आहे. अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टने कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातू आज 1000 शेतकऱ्यांच्या ऊसशेतीत या तंत्राचा वापर सुरू केला आहे. याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.