नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षानं उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार निवडीसाठीची प्रक्रिया वेगवान केली आहे. संभाव्य उमेदवार कोण असेल याबाबत चर्चा सुरु आहेत. पक्षाचे उच्च स्तरीय नेते रविवारी पुन्हा एकदा बैठक घेणार आहेत. या बैठकीत एनडीएचा उमेदवार कोण असणार याबाबत चर्चा होईल. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार दिल्लीचे नायब राज्यपाल वीके सक्सेना, बिहारचे राज्यपाल अरिफ मोहम्मद खान यांची नावं आघाडीवर आहेत. याशिवाय गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत, सिक्कीमचे राज्यपाल ओम माथूर आणि जम्मू काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा यांची नावं देखील चर्चेत आहेत.

राज्यपालांशिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सेषाद्री छारी यांचं नाव देखील चर्चेत आहे. राज्यसभेचे उपाध्यक्ष जेडीयूचे नेते हरिवंश यांचं नाव देखील चर्चेत असून आगामी बिहार विधानसभा निवडणुकीनिमित्त त्यांचं नाव चर्चेत आहे. दरम्यान, मागील वेळेप्रमाणं उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार भाजपचा असावा आणि तो भाजपची विचारधारा मानणारा असावा आणि संघाशी संबधित असेल, असे संकेत देत आहेत. साधारण महिनाभरापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची काही राज्यपाल आणि नायब राज्यपालांची बैठक झाली होती.

जगदीप धनखड यांनी 21 जुलै रोजी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला. यानंतर निवडणूक आयोगाकडून उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख 21 ऑगस्ट आहे. त्यापूर्वी एनडीएला उमेदवार निश्चित करावा लागेल. उपराष्ट्रपतींच कार्यकाळ 5 वर्षांचा असतो. जगदीप धनखड यांनी वैद्यकीय कारण देत राजीनामा दिला होता. केंद्र सरकारचा न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या विरुद्धचा महाभियोग प्रस्ताव स्वीकारण्यावरुन जगदीप धनखड आणि केंद्र सरकारमध्ये मतभेद झाले होते.

एनडीएनं उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार निवडीचा अधिकार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना दिला आहे. आगामी काळातील निवडणुकींच्या दृष्टीनं विचार करत उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार निवडला जाऊ शकतो.

एनडीए आणि इंडिया आघाडीचं संख्याबळ 

भाजपकडे लोकसभेत 240 आणि राज्यसभेत 102 खासदार आहेतससंदेतील एनडीएच्या पक्षांचं मिळून 457 खासदार सत्ताधाऱ्यांकडे आहेतयामुळं एनडीएचे उमदेवार उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विजय मिळवणार हे स्पष्ट आहे.

इंडिया आघाडीचा विचार केला असता काँग्रेसकडे लोकसभेत 99 आणि राज्यसभेत 27 खासदार आहेतइंडिया आघाडीच्या दोन्ही सभागृहातील खासदारांची संख्या 300 पेक्षा अधिक आहे