धाराशिव : उद्धव ठाकरे यांनी धाराशिवमधील सभेत बोलताना ओमराजे निंबाळकर यांच्यावर हल्लाबोल केला. याच सभेत उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील सरकारला दोन तृतियांश बहुमत मिळवून घटनेत बदल करता येतात का ते पाहायचं आहे, असा दावा देखील केला आहे. उद्धव ठाकरे यांनी धाराशिवमधील सभेतून संविधान बदलाचा मुद्दा पुन्हा समोर आणला आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला फुटलेल्या खासदारांबाबत काय निर्णय घेतात हे देखील पाहणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे काय म्हणाले?
भाजपला महाराष्ट्रात एकही स्वाभिमानी शिल्लक ठेवायचा नाही, हा स्वाभिमान केव्हा संपेल, जेव्हा शिवसेना संपेल, ठाकरे संपेल तेव्हा त्यांना मुक्तद्वार मिळेल ते एवढं करुन देखील ठाकरे का संपत नाहीत यासाठी फोडाफोडी सुरु आहे. बाळासाहेब ठाकरे आमच्या ह्रदयात जोपर्यंत आहेत तोपर्यंत ठाकरे तुमच्या कितीही पिढ्या उतरल्या तरी महाराष्ट्रातून, देशातून आणि कोणाच्या मनातून संपवू शकत नाहीत. आम्ही तुमच्याबरोबर जोडले गेलो आहोत, म्हणून इतकी वर्ष होऊन, एवढी फोडाफोडी करुन सुद्धा शिवसेना का संपवावी लागते. 40 आमदार फोडले 9 खासदार आले. परत त्यातील 6 खासदार फोडले, मग समोर काय आहे, हे दिसतंय ते काय आहे.ही खरी शिवसेना आहे, बाळासाहेबांची शिवसेना आमदार, खासदारांच्या संख्येमध्ये मोजता येत नाही. ती घराघरात आणि मनामनामध्ये, ह्रदयात घर करुन बसलेली आहे. नुसती मन की बात करुन नाही चालत, दिल की बात करावी लागते, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
राज्यघटनेत बदल करता येतात का त्यांना पाहायचंय: उद्धव ठाकरे
आतासुद्धा हे लटकणार आहेत. दोन दिवसांपूर्वी आपले दोन खासदार ओम बिर्लांना जाऊन भेटून आले आहेत. त्यांना घटनेचं एक पुस्तक दाखवलं आहे, त्याच्यातील एक नियम दाखवलं आहे. ते म्हणतात नऊ पैकी 6 झाले म्हणजे दोन तृतियांश झाले आहेत. माझ्या कानावर आलं त्यांचं कधीच ठरलं होतं, फक्त इथला जरा अडून बसला होता, कारण त्याला माहिती होतं, पाच झालेत, सहा झालेत तोपर्यंत दोन तृतियांश होत नाहीत, ताणून धरलं, भाव वाढवला मग गेला. कायद्यात जे लिहिलंय, घटनेत जे लिहिलंय, त्यानुसार दोन तृतियांश संख्येनं इकडून तिकडे गेले तरी पक्षात विलीन होण्याचा निर्णय पक्षानं घ्यावा लागतो आणि त्याला दोन तृतियांशनं पाठिंबा द्यावा लागतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
आता पाहूया ओम बिर्ला काय करतात, लोकसभेवेळी आम्ही जे सांगत होतो त्यामुळं तुम्ही इथला खासदार निवडून दिलात. आता सुद्धा दोन तृतियांश बहुमत पाहिजे, कारण त्यांना घटना पायदळी तुडवायची होती. आता सुद्धा दोन तृतियांश बहुमत करुन घटनेत बदल करता येतात का हे त्यांना पाहायचं आहे, म्हणून त्यांना दोन तृतियांश बहुमत पाहिजे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
