सिंधुदुर्ग : राज्यात नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात (Ashok kharat) प्रकरण गाजत असून राजकीय नेत्यांची नावेही समोर येत आहे. तसेच, राजकीय नेत्यांवर आरोपही केले जात आहेत. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज पत्रकार परिषद घेत एसआयटी आणि गृहमंत्र्यांना सवाल केले आहेत. महायुतीमधील नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दीपक केसरकरांना चौकशीला कधी बोलावणार? असा सवाल त्यांनी केला. अशोक खरातचे समोर आलेला सीडीआर खरा आहे की खोटा आहे हे मुख्यमंत्र्यांनी सांगावं. जर ते खरे असतील तर दीपक केसरकर (Deepak kesarkar) आणि एकनाथ शिंदे यांना चौकशीला कधी बोलावणार? असे त्यांनी म्हटले होते. आता, सुषमा अंधारेंच्या प्रश्नावर केसरकर यांनी प्रत्युत्तर दिलंय. 

Continues below advertisement

अशोक खरातचे समोर आलेला सीडीआर खरा आहे की खोटा आहे हे मुख्यमंत्र्यांनी सांगावं. जर ते खरे असतील तर दीपक केसरकर आणि एकनाथ शिंदे यांना चौकशीला कधी बोलावणार? रुपाली चाकणकर यांना गजाआड कधी करणार? या प्रश्नांचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं, असे म्हणत सुषमा अंधारेंनी खरातप्रकरणावरुन राज्य सरकारला अनेक सवाल केले आहेत. मात्र, सुषमा अंधारेंचे आरोप हे राजकीय हेतुने प्रेरीत असल्याचं स्पष्टीकरण आमदार दीपक केसरकर यांनी दिलंय. 

अशोक खरात प्रकरण आणि सुषमा अंधारे यांनी केलेल्या आरोपासंदर्भात एस.आय.टी. आणि ईडी दोन्ही चौकशा चालू आहेत. कुठं चुकून जरी नाव मिळालं, तरी त्या व्यक्तीला बोलवलं जातं. शेवटी कोणाला भेटणं किंवा कोणाबरोबर फोटो असणं, हा काही गुन्हा होऊ शकत नाही. त्यामुळे केवळ प्रत्येक गोष्टीला राजकीय वळण देणं हे योग्य नाही, असे दीपक केसरकर यांनी सुषमा अंधारेंच्या आरोपावर म्हटले. एसआयटी आणि ईडीला त्याचं काम करू द्या. जिथे जिथे त्यांना कोणाची नोंद मिळते, त्यावेळी त्यांनी चांगल्या-चांगल्या लोकांना बोलवलेलं आहे. त्यामुळे माहिती घेण्यामध्ये काहीच चुकीचं नाही. माझा काही संबंध नसताना विनाकारण आमची नावं घेणं, केवळ आमची ओळख आहे म्हणून, आरोप करणे हे अत्यंत चुकीचं आहे, असेही केसरकर यांनी म्हटले. 

Continues below advertisement

सुषमा अंधारेंच्या प्रश्नाला उत्तर देण्याचं कुठलंही बंधन हे माझ्यावर नाही. त्या एक राजकीय व्यक्ती आहेत, त्यामुळे राजकीयदृष्ट्या आम्हाला बदनाम करण्याचा त्या प्रयत्न करणार. परंतु, त्याची उत्तरं आम्ही दिली पाहिजेत असं बिलकुल नाही. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की, या संदर्भात मी काहीही बोलणार नाही. एसआयटी आणि ईडी त्यांची कारवाई करेल, असे म्हणत सुषमा अंधारे यांचे आरोप राजकीय असल्याचे केसरकर यांनी म्हटले. 

एकनाथ शिंदे बोलावून सूचना देतील

दरम्यान, शिवसेना पक्षात अंतर्गत खदखद असल्याबाबत त्यांना विचारणा केली असता, हे जे प्रश्न आहेत, ते एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आहेत. कुठेही जर काही चूक झालेली असेल, एखाद्या मंत्र्याकडून चूक झालेली असेल, तर त्यांना बोलवून योग्य त्या सूचना एकनाथ शिंदे देतील. त्यामुळे पक्षामध्ये ही नाराजी पुढच्या काळात राहणार नाही, असे स्पष्टीकरण दीपक केसरकर यांनी दिले.

आदित्य ठाकरेंना शुभेच्छा

ठाकरेंच्या शिवसेना पक्षात आदित्य ठाकरेंना कार्याध्यक्ष बनवणे हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यामुळे, त्यांना मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. तरुण नेतृत्व आहे, चांगल काम त्यांच्या हातून घडावं, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, अशी प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरेंच्या कार्याध्यक्षपदासंदर्भाने होत असलेल्या चर्चेबाबत दिली.

हेही वाचा

परतवाड्याप्रमाणे अशोक खरातच्या फार्म हाऊसवर, चाकणकरांच्या प्रॉपर्टीवर बुलडोझर कधी चालवणार? आदिती तटकरे शांत का? सुषमा अंधारेंचा प्रश्नांचा वर्षाव