Jyoti Waghmare & Kumar Ashirwad: गेल्या काही दिवसांपासून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले आहे. सोलापूरमधील सीना नदीच्या (Sina River) पूराचे पाणी अनेक गावांमध्ये शिरल्यामुळे शेती आणि घरदारं पाण्याखाली गेली होती. या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात (Solapur Rain Flood) सातत्याने राजकीय नेत्यांचे दौरे सुरु आहेत. उठसूट पूरपरिस्थितीची पाहणी करायला येणाऱ्या या राजकीय नेत्यांमुळे स्थानिक प्रशासनावर मोठा ताण येत आहे. अशाच प्रकारामुळे सोलापूर जिल्ह्यातील पाकणी गावात जिल्हाधिकाऱ्यांनी शिंदे गटाच्या नेत्याला सुनावल्याचा प्रसंग सुनावला आहे.

Continues below advertisement

शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे या पाकणी गावात पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी गावकऱ्यांनी त्यांना प्रशासन आम्हाला मदत करत नसल्याचे सांगितले. तेव्हा ज्योती वाघमारे यांनी थेट जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना फोन लावला आणि त्यांना जाब विचारु लागल्या. तुमचे सरकारी अधिकारी मदतीसाठी गावातच नाहीत. गावातील नागरिकांना जेवणाची किट मिळालेली नाहीत. गावाची लोकसंख्या इतकी मोठी आहे, मात्र जेवणाची व्यवस्था का नाही, असा सवाल ज्योती वाघमारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना विचारला. यावर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद चांगलेच संतापले. त्यांनी ज्योती वाघमारे यांनी स्पष्ट शब्दांत सुनावले. त्यांनी म्हटले की, 'तुमचं राजकारण नंतर करा. आम्ही मदत पोहोचवतोय पण तुम्ही देखील तुमच्या पक्षाच्या वतीने मदत करा', असे प्रत्युत्तर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले. ज्योती वाघमारे आणि जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यात झालेल्या संवादची ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेमुळे राजकारण्यांच्या दौऱ्यांमुळे पूरग्रस्त भागांमध्ये सरकारी यंत्रणांना मदतीत येणाऱ्या अडथळ्यांचा मुद्दाही पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

या सगळ्या प्रकारानंतर ज्योती वाघमारे यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध करुन संताप व्यक्त केला. शेतकऱ्यांचा आक्रोश प्रशासनापर्यंत पोचवणे हा माझा गुन्हा आहे का? मी जिल्हाधिकाऱ्यांना काय दोन नंबरच्या धंद्यासाठी, टेंडरच्या टक्केवारीसाठी फोन केला होता का? लोकांचा आवाज बनणे हा जर गुन्हा असेल तर कुणी फासावर लटकवले तरी मी चालेल, मी लढत राहीन, असे ज्योती वाघमारे यांनी म्हटले.

Continues below advertisement

आणखी वाचा

दिवाळीआधी शेतकऱ्यांना मदत देणं शक्य, महसूलमंत्र्यांची माहिती; म्हणाले, चार प्रोजेक्ट नाही झाले तरी चालतील पण.....

ज्या गोदापट्ट्याने आजपर्यंत सर्वांना जगवलं त्यांच्यावरच उपासमारीची वेळ, सरकारी मदतीची वाट बघताना धीर खचला