Shiv Sena on Rohini Khadse : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना आवश्यक ती मदत पुरवली. यावरून शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी जे लोक कधीही विमानात बसले नाहीत. त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विमानात बसवून आणलं, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी जोरदार हल्लाबोल केला होता. एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदावर बसवून महाराष्ट्रातील जनतेने उपकार केले आहेत. त्यामुळे अशा वक्तव्याने जनता तुम्हाला खुर्ची सोडायला भाग पाडेल हे विसरू नका, असे त्यांनी म्हटले होते. आता रोहिणी खडसे यांच्या टीकेवर शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्ता ज्योती वाघमारे (Jyoti Waghmare) यांनी जोरदार पलटवार केलाय.  

शिवसेना प्रवक्ता ज्योती वाघमारे म्हणाल्या की, रोहिणी खडसे यांची मला दया येते. रोहिणी ताई तुमचा आवाका किती? तुमची बुद्धी किती आणि तुम्ही बोलता किती? बापाच्या पुण्याईवर तुम्ही राजकारणात तग धरून आहात. एकनाथ खडसे यांनी जाहीरपणे सांगितलं होतं की, एकनाथ शिंदे यांनी विमान पाठवलं नसतं तर माझं विमान कधीच स्वर्गात उडालं असतं. रोहिणीताई एकनाथ शिंदे साहेबांनी पाठवलेलं विमान किंवा एअर ॲम्बुलन्स एकनाथ खडसे यांचा प्राण वाचवतो. आपल्या वडिलांचे प्राण वाचवणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बोलणे आपल्या संस्कारात बसते का? असे म्हणत त्यांनी रोहिणी खडसे यांच्यावर निशाणा साधलाय. 

त्याला आम्ही बेशरमपणा म्हणायचा का? 

ज्योती वाघमारे पुढे म्हणाल्या की, एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः खर्च करून चार विमान पाठवली. रोहिणी ताई तुमचा अभ्यास कमी पडतो. थोडा अभ्यास करून बोलत जा. जे कोणी कधीही विमानात बसले नाही त्यांना आम्ही विमानात आणलं तर तुम्हाला मुंग्या का लागल्यात? तुमच्या पक्षप्रमुखांनी साधी संवेदना सुद्धा व्यक्त केली नाही. त्याला आम्ही बेशरमपणा म्हणायचा का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय. आता ज्योती वाघमारे यांच्या टीकेवर रोहिणी खडसे काय पलटवार करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

नेमकं काय म्हणाल्या होत्या रोहिणी खडसे? 

रोहिणी खडसे यांनी म्हटलं होतं की, दहशतवादी हल्ल्यासारख्या गंभीर घटनांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सध्या दुर्दैवाने श्रेयवादाची लढाई सुरु आहे. अशा परिस्थितीत सर्वांनी एकत्र येऊन या संकटाचा सामना करणे अपेक्षित असताना, खासदार नरेश म्हस्के यांनी केलेल्या वक्तव्याचे आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो. महाराष्ट्रातील जनता उपकाराची भाषा सहन करणार नाही. उपमुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे यांना बसवून जनतेने त्यांच्यावर उपकार केले आहेत, त्यामुळे अशा वक्तव्याने जनता तुम्हाला खुर्ची सोडायला भाग पाडेल हे विसरू नका. ज्या विमानातून तुम्ही लोकांना आणलेत, ती सेवा लोकांच्या कररूपात मिळालेल्या निधीतून चालवली जाते. त्यासाठी तुम्ही वैयक्तिक पैसे खर्च केलेले नाहीत. त्यामुळे ‘उपकार’ केल्याची भाषा वापरणे हे पूर्णतः अनुचित आणि असंवेदनशील आहे, असे हल्लाबोल त्यांनी केला होता.

आणखी वाचा 

लपून बसलेल्या 107 जणांना पोलीस शोधतील अन् तिथेच ठोकतील; एकनाथ शिंदेंचा गर्भित इशारा