Sharad Pawar PC : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालावर (Lok Sabha Election Result 2024) एका मुलाखतीत बेधडक वक्तव्य केले आहे. यंदाच्या लोकसभेच्या निकालाने सर्वांना जमिनीवर आणलं असल्याचे म्हणत त्यांनी राजकीय पक्षांना सुनावले. यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज ठाकरेंना एका वाक्यात टोला लगावला आहे. तसेच शरद पवारांनी विविध मुद्द्यांवरही भाष्य केले आहे. 


शरद पवार म्हणाले की, जागतिक क्रिकेटमध्ये एकेकाळी ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांचे स्थान होते. हा इतिहास होता. पण, आता भारतीय क्रिकेट संघाने आपलं स्थान प्रस्थापित केले आहे. कालच्या सामन्यात भारतीय संघाने अद्भुत प्रकारचा चमत्कार केला. थोडीशी चिंता वाटावी, अशी स्थिती होती. टी 20 विश्व चषकाच्या स्वप्नाचा दुष्काळाचा काळ संपला. आपल्या संघाचे कौतुक केलं पाहिजे. राहुल द्रविडच्या रूपात आपल्याला उत्तम प्रशिक्षक मिळाला, असे कौतुक शरद पवारांनी टीम इंडियाचे केले आहे. 


जागा वाटपाची चर्चा लवकरच होईल


विधानसभा निवडणुकीबाबत शरद पवार म्हणाले की, आमचं लक्ष एकच आहे की, अर्जुनाला जसा डोळा दिसत होता, तसा आमचं उद्याची महाराष्ट्राची निवडणूक आहे. विधानसभेची निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट एकत्र लढणार आहे. जागा वाटपाची चर्चा लवकरच होईल. तीन महिने हातामध्ये आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. 


शरद पवारांचा राज ठाकरेंना टोला 


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालाने सर्वांना जमिनीवर आणले असे वक्तव्य एका मुलाखतीत बोलताना केले. यावरून शरद पवारांनी राज ठाकरेंना एका वाक्यात उत्तर दिले आहे. मला माहित नाही,  आमचे पाय जमिनीवर आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. 


नव्या पिढीतल्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्याचा आमचा प्रयत्न


पिंपरी चिंचवड मधील अजित पवार गटाच्या नगरसेवकांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर येत होती. यावर शरद पवार म्हणाले की, हल्ली मला रोज दोन-तीन तास काढावे लागतात. नवीन लोकं पक्षात येणारे आहेत त्यांना भेटायला. नगरसेवकांनी आमची भेट घेतली. येणाऱ्याचे आम्ही त्यांचे स्वागत करतो. नव्या पिढीतल्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्याचा आमचा प्रयत्न राहील, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे. 


थोड्याच दिवसात वस्तुस्थिती कळेल, आम्ही त्याची वाट बघतोय


महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावर शरद पवार म्हणाले की, तुमच्याकडे खिशात काय? हे न तपासता तुम्ही बाजारात जाऊन खरेदी करायला गेलात तर काय अवस्था होते हे मी सांगायची गरज नाही. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने जो निकाल दिला त्याच्यापासून धसका घेतला आहे. म्हणून अशाप्रकारची आखणी केली आहे. तातडीने या सगळ्या गोष्टी आम्ही देणार असं जाहिर केलं.  आता दिवस फार राहीले नाहीत. आता थोड्याच दिवसात वस्तुस्थिती कळेल, आम्ही त्याची वाट बघतोय, असा इशारा त्यांनी यावेळी महायुतीला दिला. 


आणखी वाचा 


मोठी बातमी! अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठे खिंडार, बडा नेता शरद पवार यांच्या गळाला?