अहमदनगर - राज्यातील काही महत्त्वाच्या मतदारसंघात हाय व्होल्टेज लढत होत असून अहमदनगर (Ahmednagar) लोकसभा मतदारसंघातील लढतीकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. पारनेरचे माजी आमदार निलेश लंके यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन खासदार (Sujay Vikhe) सुजय विखेंविरुद्ध शड्डू ठोकला आहे. एकीकडे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ही लढत असल्याचं त्यांनी यापूर्वी म्हटलं होतं. तर, स्वत: शरद पवारांनीही निलेश लंकेंसाठी अहमदनगर लोकसभा मतदारसंघात विशेष लक्ष घातलं आहे. शरद पवारांची (Sharad Pawar) आज येथील गांधी मैदानात सभा होत आहे. तत्पूर्वीआयोजित बैठकीच्या ठिकाणी हिटलरशी संबंधित काही पत्रके वाटण्यात आली आहेत. या पत्रकातून अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्यात आल्याचे दिसून येते. हिटरलरशी साधर्म्य असलेली माहिती देताना, महाविकास आघाडीकडून मोदींना लक्ष्य करण्यात आलं आहे. 


राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची आज नगर शहरात सभा आहे. त्यापूर्वी महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी त्यांची बैठकही पार पडली. नगर दक्षिण मतदारसंघाचा आढावा शरद पवार या दौऱ्यातून घेत आहेत. माजी आमदार निलेश लंकेंना निवडून आण्यासाठी शरद पवार स्वत: मैदानात उतरले आहेत. त्यासाठी, महाविकास आघाडीतील प्रत्येक पदाधिकारी, वकील,विद्यार्थी, व्यापाऱ्यांशी देखील शरद पवार संवाद साधत आहेत. नगर जिल्ह्यातील लोकांच्या भावना, त्यांच्या मनातील कौल समजून आहेत. शहरातील गांधी मैदान येथे मविआ उमेदवार निलेश लंके यांच्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेच्या समारोप कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित राहिले असून सभेच्या ठिकाणी पत्रके वाटण्यात आल्याने अनेकांना आश्चर्य वाटले. 


"माझा अॅडॉल्फ हिटलर विषयीचा अभ्यास व निरीक्षण" या शिर्षकाखाली ही पत्रके असून या पत्रकात हिटलरबाबत काही महत्वाचे मुद्दे असल्याचे पाहायला मिळत आहे. या पत्रकात जवळपास 23 मुद्दे लिहिल्याचे दिसून येत आहेत. ते खालीलप्रमाणे आहेत. दरम्यान, या पत्रकामुळे बैठकीच्या ठिकाणी काही प्रमाणात संभ्रमवस्ता निर्माण झाली होती. 


पत्रकातील 23 मुद्दे


१) हिटलरने लग्न केले नव्हते.


२) हिटलर एका देशातील विशिष्ट धर्मातील लोकांचा शत्रू मानत असे.


३) हिटलरच्या समर्थकांना हिटलरची का सहन व्हायची नाही.


४) हिटलर लहानपणी रंग विकण्याचे, चित्र काढण्याचे काम करायचा.


५) हिटलरनी प्रसार माध्यमे आपल्या ताब्यात ठेवली होती.


६) हिटलरने सर्व कामगार आणि इतर चळवळी मोडून काढल्या.


७) हिटलर आपल्या विरोध करणाऱ्याला देशद्रोही ठरवत असे.


८) हिटलर साधा कार्यकर्ता म्हणून नाजी पक्षात घुसला आणि नंतर सर्व नाजी पक्षात जेष्ठांना डावलून सत्ता काबीज केली.


९) हिटलर सत्ता काबीज करताना प्रचारात देशातील सर्व समस्या चुटकी सरशी निवारण करील असे सांगायचा.


१०) हिटलरने सत्तेत आल्यावर समस्यांचे निवारण तर केले नाहीच, पण देश बरबाद केला.


११) हिटलर प्रचारात नेहमी "God Times Will Com" म्हणजेच "अच्छे दिन आयेंगे" असे सांगत असे.


१२) हिटलरने पार्टी जिंकल्यावर त्याने पहिल्यांदा संसदेत प्रवेश केल्यावर तो खूप रडला होता.


१३) हिटलरनी खोटं बोलून सत्ता मिळवली होती.


१४) हिटलरला टापटीत राहायला, नटायला आवडायचे.


१५) हिटलर खोटे बोलण्याच्या कलेमध्ये तरबेज होता.


१६) हिटलर भाषणांमध्ये कायम मी मी करायचा.


१७) हिटलरला रेडिओवर भाषण द्यायचा शोक होता.


१८) हिटलरने कधीच पत्रकार परिषद घेतली नाही.


१९) हिटलरचा त्याच्या मंत्रीमंडळावर विश्वास नव्हता.


२०) हिटलर आपल्या भाषणांमध्ये नेहमी फ्रेंड-फ्रेंड म्हणजे मित्रो-मित्र-मित्रो असे म्हणत असे.


२१) हिटलरचा फोटो काढून घ्यायला खूप आवडायचे.


२२) विशेष म्हणजे हिटलर प्रत्येक निवडणुकीच्या आधी देशांच्या पारंपारिक शत्रू विरुद्ध कुरापती काढून युद्ध करायचा आणि त्याची सहानुभूती घेऊन तो निवडणूक जिंकून यायचा अशा प्रकारे तो जनतेला मूर्ख बनवत होता.


२३) हिटलरने जनतेच्या आक्रोश नंतर स्वतः आत्महत्या केली.


अशा मुद्द्यांचा समावेश आहे...आणि शेवटी


"जर्मन प्रजेला हिटलर समजेपर्यंत देश रसातळाला गेला होता. संविधान वाचवा ! देशाची लोकशाही टिकवा !"


असं आवाहन करण्यात आलं आहे...एकंदरीतच या पत्रकाच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे पंतप्रधान मोदींवर निशाणा साधण्यात आला आहे.



दरम्यान, गांधी मैदानातील या सभेसाठी शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात हे देखील उपस्थित राहणार आहे.