मुंबई : राहुल गांधी (Rahul Gandhi) गेल्या एक महिन्यापासून सरकारला त्यांचा आरसा दाखवत आहेत. त्यांनी मोदी (PM Narendra Modi) आणि शाह (Amit Shah) यांना सळो की पळो करून सोडले आहे. त्यामुळे राहुल गांधी असतील आम्ही सगळे असू. आम्हाला पुन्हा एकदा कारवाईला समोर जावे लागेल. आमची तयारी आहे, असे हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. तसेच परदेशी भूमीवर कट रचला जात आहे. राहुल गांधींसह आमच्यावर गुंडांच्या मदतीने हल्ला होऊ शकतो, असा गंभीर आरोपदेखील त्यांनी केला आहे. 


संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले. लाडकी बहीण योजनेबाबत ते म्हणाले की, लाडकी बहीण योजनेतील ही फसवणूक आहे. निवडणुकीसाठी दोन महिने आहेत. त्यानंतर लाडक्या बहिणीला काहीही मिळणार नाही. हे कर्जाचा डोंगर करतील आणि त्यानंतर पळून जातील. लाडकी बहीण योजनेसाठी जो पैसा आहे तो सरकारी तिजोरीतला पैसा आहे. पण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि फुटलेल्या आमदारांच्या पैसा हा जनतेचा लुटलेला पैसा आहे. ठेकेदारीतून मिळालेला पैसा आहे, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी यावेळी केला आहे.


परदेशी भूमीवर कट रचला जातोय


राहुल गांधी यांनी ईडी आपल्या विरोधात छापेमारीची योजना आखत असल्याचे म्हटले आहे. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, राहुल गांधी हे विरोधी पक्ष नेते आहेत. गेल्या एक महिन्यापासून ते ज्या पद्धतीने सरकारवर हल्ला करत आहे. सरकारला त्यांचा आरसा दाखवत आहे. मोदी आणि शाह यांना सळो की पळो करून सोडत आहे. त्यामुळे राहुल गांधी असतील आम्ही सगळे असू. आम्हाला पुन्हा एकदा कारवाईला समोर जावे लागेल. आमची तयारी आहे. पण, आता इतके सोपे राहिले नाही. विरोधी पक्ष अत्यंत मजबूत आहे. तुम्ही तुमचं बहुमत गमावले आहे. तुम्ही एकमताने जरी आला असाल. तरीही केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर, घटनाबाह्य काम करण्याचे व्यसन काही सुटत नाही, असे त्यांनी यावेळी म्हटले आहे. परदेशी भूमीवर कट रचला जात आहे. राहुल गांधींसह आमच्यावर गुंडांच्या मदतीने हल्ला होऊ शकतो, असा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. 


गुंडगिरीला पोसणारे सरकार 


अमोल मिटकरी आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत संजय राऊत म्हणाले की, हे दोन्ही नेते आपल्या पक्षाचे नेतृत्व करतात. दोन्हीही विधिमंडळाचे महाराष्ट्राचे सदस्य आहेत. त्यांना आपापल्या पक्षाची भूमिका असू शकते. ती भूमिका ते मांडू शकतात. ती लोकशाहीला धरून आहे आम्ही हे मानतो. अनेकदा कोणाला आवडत नसेल पण त्यांच्यावर जर कोणी अशा प्रकारे हल्ले करत असतील आणि त्या हल्ल्याला जर सरकारचे समर्थन असेल,  सरकार मुकदर्षक बनले असेल. तर या राज्यात घटनाबाह्य सरकार आहेच पण ते गुंडगिरीला पोसणारे सरकार आहे. या गुंडगिरीचे नियंत्रण दिल्लीतून होत आहे. गुजरातमधून होत आहे हे स्पष्टपणे दिसून येत आहे. ज्या पद्धतीने दाऊद इब्राहिम त्याच्या मुंबईतल्या टोळ्या चालवतो त्याच पद्धतीने हे सरकार म्हणजे टोळी आहे. त्या टोळीचे प्रमुख दिल्लीत बसले आहेत. हे टोळ्या चालवत आहेत मग त्या टोळ्या आपली सत्ता टिकवण्यासाठी खालच्या गुंडांच्या टोळ्या पोसत आहेत. त्यामुळे आमदार आणि खासदारांवर हल्ले होत आहेत. 


आणखी वाचा


Rahul Gandhi: संसदेतील घणाघाती भाषणानंतर राहुल गांधी 'चक्रव्युहात' अडकणार, ईडीकडून घरावर छापेमारीची तयारी?