Sanjay Raut on Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या समोरच जय गुजरातचा नारा दिला. यामुळे त्यांच्यावर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केलाय. यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपली सविस्तर भूमिका मांडली. तो कार्यक्रम गुजराती समाजाचा होता. गुजराती समाजाने महाराष्ट्राच्या विकासात दिलेलं जे योगदान आहे त्या अनुषंगाने जय गुजरात म्हटले. गुजरात म्हणजे पाकिस्तान नव्हे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले. आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. 

संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे हे या मंत्रिमंडळातलं कच्चं मडकं आहे. ते सध्याच्या राजकीय परिस्थितीने गोंधळलेले आहेत. त्यातून त्यांच्याकडून अशा प्रकारचे विधाने होतात. आम्ही कुठे म्हणतो गुजरात पाकिस्तानमध्ये आहे? गुजरात आणि महाराष्ट्र कधीकाळी एकच होता. एकनाथ शिंदेंना माहिती नसेल. बडोदा हे मराठा संस्था आहे. बडोदा आणि गुजरातवर गायकवाड आणि भोसले यांचं राज्य होतं, म्हणून अमित शाह किंवा मोदी बडोद्याला गेल्यावर जय महाराष्ट्र म्हणत नाहीत. इंदूर, ग्वाल्हेर हे होळकर आणि शिंदे यांची मराठी राज्य आहेत. मी फडणवीस यांना सांगू इच्छितो की, पेशवे देखील तिकडेच गेले होते. इतिहास मला देखील माहित आहे. योगी आदित्यनाथ हे तिथे जय महाराष्ट्र म्हणत नाही ते जय उत्तर प्रदेशच म्हणतील. त्यामुळे उगाचच सारवासारव करू नका. महाराष्ट्राला अपमानित करण्याचा प्रयत्न आपण करत आहात. खरं म्हणजे फडणवीसच शिंदेंना अडचणीत आणत आहेत. उत्तेजन देत आहेत, असा हल्लाबोल त्यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला.

एकनाथ शिंदेंनी माफी मागावी

संजय राऊत पुढे म्हणाले की, गुजरातच्या आमच्या बांधवांनी महाराष्ट्रामध्ये विकास कामे केली. पैसे काय काय कमावले? संपत्ती काय काय कमवली? उपकार करताय का? पारसी समाजाने सुद्धा येथे योगदान दिले आहे. सगळ्यात जास्त योगदान मुंबईच्या उभारण्यात पारसी समाजाचे आहे. मिस्टर शिंदे तुम्ही असे बोलून मराठी माणसाचा अपमान करत आहात. ही मुंबई मराठी मजुरांच्या, श्रमिकांच्या, गिरणी कामगारांच्या श्रमातून आणि रक्तातून निर्माण झाली आहे. या शेठजींच्या पैशातून निर्माण झालेली नाही. एकनाथ शिंदेंनी सर्वात आधी माफी मागितली पाहिजे. एकनाथ शिंदे यांची तरफदारी केल्याबद्दल आणि महाराष्ट्राचा अपमान केल्याबाबत फडणवीस यांनी देखील माफी मागितली पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.   

आणखी वाचा

Shiv Sena : शरद पवार म्हणाले जय कर्नाटक, आदित्य ठाकरेंचा जय उत्तरप्रदेशचा नारा; शिंदेंच्या सेनेकडूनही आता 'तो' जुना व्हिडीओ शेअर