Raj Thackeray-Uddhav Thackeray: त्रिभाषा धोरणाबाबतचा जीआर सरकारने रद्द केल्यावर आता 5 जुलैला ठाकरेंची शिवसेना आणि मनसे विजयी मेळावा (MNS-Shivsena UBT Melava) साजरा करणार आहेत. मुंबईतील वरळी डोम येथे ठाकरेंची शिवसेना (Shivsena UBT) आणि मनसे (MNS) यांचा भव्य एकत्रित मेळावा होणार आहे. विजयी मेळाव्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) एकाच व्यासपीठावर पाहायला मिळणार आहेत. या विजयी मेळाव्याच्या ठिकाणासह आता वेळही जाहीर करण्यात आली आहे. 

ठाकरे बंधूंच्या या विजयी मेळाव्याची सुरुवात 5 जुलैला सकाळी 10 वाजता होणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून विजयी मेळावा कुठे घ्यायचा, किती वाजता घ्यायचा, याबाबत मनसे आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये चर्चा सुरु होती. आज शिवसेनेचं मुखपृष्ठ असलेल्या सामनामधून विजयी मेळाव्याचं ठिकाण अधिकृतपणे जाहीर करण्यात आलं. परंतु या मेळाव्याची वेळ मात्र सांगितली नव्हती. परंतु आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र पत्र काढत विजयी मेळाव्याचं ठिकाण आणि वेळ सांगितली आहे. त्यामुळे 5 जुलै रोजी, सकाळी 10 वाजता ठाकरे बंधू संपूर्ण महाराष्ट्राला-देशाला एकत्र पाहायला मिळणार आहे. 

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची A टू Z माहिती-

विजयी मेळावा-

दिनांक- 5 जुलै 2025ठिकाण- NSCI वरळी डोम, मुंबईवेळ- सकाळी 10 वाजता

ठाकरे बंधूंचं आवाहन-

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एक पत्रक काढत सर्वांना आव्हान केलं आहे. आवाज मराठीचा...असं म्हणत मराठी मातांनो, भगिनींनो आणि बांधवांनो, सरकारला नमवलं का? तर हो नमवलं..., कोणी नमवलं तर ते तुम्ही, मराठी जनांनी नमवलं...आम्ही फक्त तुमच्या वतीने संघर्ष करत होतो. त्यामुळे हा आनंद साजरा करतानासुद्धा, आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत, बाकी जल्लोष तुम्ही करायचा आहे. वाजत गाजत या, जल्लोषात, गुलाल उधळत या...आम्ही वाट बघतोय..., असं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. विशेष म्हणजे या पत्रकाच्या शेवटी पहिले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे असं नावंही देण्यात आले आहे. 

उद्धव ठाकरेंचं ते एक वाक्य अन् अख्ख्या महाराष्ट्रात चर्चा-

उद्धव ठाकरेंनी 29 जून रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेतील एका वाक्याची संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा झाली. संकट आल्यावर पुन्हा जागे व्हायचे असे नको म्हणून ही एकजूट कायम राहावी. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातही सर्व नेते पक्षभेद विसरून एकत्र आले होते, तेव्हा तो डाव उधळला आणि आताही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसंच मराठी माणसानं एकत्र येण्यासाठी संकटाची वाट पाहू नये, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी मनसेशी मोर्चापलिकडे युती ठेवण्याचे संकेतही दिले आहेत. मराठी माणूस एकत्र न येण्यासाठी भाजपने प्रयत्न केले. पण, मराठी माणसांच्या एकजुटीची शक्ती पाहून सरकारने माघार घेतली, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

संबंधित बातमी:

Raj Thackeray-Uddhav Thackeray: राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकाच मंचावर; 'सामना'मधून विजयी मेळाव्याचे ठिकाण अधिकृतपणे जाहीर

Raj Thackeray-Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचं ते एक वाक्य अन् अख्ख्या महाराष्ट्रात चर्चा; राज ठाकरे आज पत्रकार परिषद घेणार, नेमकं काय घडलं?