Raj Thackeray and Mohan Bhagwat: सरसंघचालक मोहन भागवत यांनी महाराष्ट्रातील मराठी विरुद्ध अमराठी वादाबाबत भाष्य केल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. भाषिक आधारावर भेदभाव करणे हा स्थानिक आजार असल्याची टिप्पणी मोहन भागवत यांनी केली होती. मोहन भागवत यांच्या या वक्तव्याबद्दल राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी संताप व्यक्त केला आहे. मराठी माणूस सहनशील आहे पेक्षा इथले सत्ताधारी लिबलिबित कण्याचे आहेत म्हणून भागवतांची (Mohan Bhagwat) हिंमत होते. काही महिन्यांपूर्वी निवडणुकीच्या तोंडावर भय्याजी जोशींनी मुंबईची भाषा (Marathi Language) ही फक्त मराठी नाही तर ती गुजराती पण आहे अशा आशयाचं विधान करत मराठी माणसाला डिवचत गुजराती भाषिकांना चोंबाळण्याचा प्रयत्न केला. हे सगळं करून अप्रत्यक्षपणे भाजपला फायदा कसा होईल हे पाहिलं. मुळात स्वतःला अराजकीय संघटना म्हणवून घेणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या भानगडीत मुळात पडायचंच कशाला?, असा सवाल राज ठाकरे यांनी मोहन भागवत यांना विचारला.

Continues below advertisement

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची  "100 वर्षांचा संघाचा प्रवास - नवीन क्षितिज" ही  दोन दिवसीय व्याख्यानमाला नुकतीच मुंबईत पार पडली होती. या कार्यक्रमाला अनेक सेलिब्रिटींना आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमात मोहन भागवत यांनी मराठी विरुद्ध अमराठी वादाबाबत भाष्य केले होते. समाजात भाषेच्या आधारावर भेदभाव आहे, असे नाही. जेव्हा काही लोकांकडून तशी मांडणी केली जाते तेव्हा काही लोकांच्या हातून तसं घडतं. याचा अर्थ सर्व मराठी भाषिक लोक तलवारी घेऊन बाहेर आले आणि अन्य भाषिक लोक भाले घेऊन बाहेर आले, असे होत नाही. हा सगळा वाद सुरु असताना आपापसातील व्यवहार सुरुच होते, मैत्री कायम होती. हा एक स्थानिक आजार आहे, त्याला सार्वजनिक करु नये, हा आजार फैलावणारच नाही, असे मी मानत नाही. हा आजार इतरत्र फैलावू नये, ही चिंता आहे, असे मोहन भागवत यांनी म्हटले होते.

Raj Thackeray on beef Politics:  देशात गोहत्येचं राजकारण करून जो तमाशा सुरू आहे आणि त्यातून माथी भडकवली जात आहेत त्यावर तुम्ही कधी बोलणार, राज ठाकरेंना भागवतांना सवाल

Continues below advertisement

मुळात भाषावार प्रांतरचना या देशात का करावी लागली हा इतिहास भागवतांना निश्चितच माहीत असावा असे आम्ही समजतो ! भाषेबद्दलचं प्रेम, प्रांताबद्दलचं प्रेम हा जर भागवतांना आजार वाटत असेल तर त्यांच्या निदर्शनास हे आणून देऊ इच्छितो की हा आजार या देशातील बहुसंख्य राज्यांमध्ये असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.

रझा अकादमीच्या दंगलीविरोधात मोर्चा काढणारा आणि मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात आंदोलन करणारा, तसेच हिंदू सणांच्या वेळी मोठमोठ्याने लाऊडस्पीकर लावणे आणि मोठमोठ्याने डिजे लावून नागरिकांना त्रास होत असताना त्या विरोधात भूमिका घेणारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हाच पक्ष होता. जे चूक ते चूकच हे आम्ही ठासून बोलतो. तसं मोहनराव आपण कधी बोलणार ? हिंदुत्वाच्या नावाखाली देशभरात जो धिंगाणा सुरु आहे , उत्तर भारतात कावड यात्रांमधे बिभत्स पद्धतीने महिलांना नाचवले जाणे , तसेच २०१४ ला बीफ एक्सपोर्ट मधे जो आपला देश ९ व्या क्रमांकावर होता तो आज दुसऱ्या क्रमांकावर आलाय आणि आपल्या देशात गोहत्येचं राजकारण करून जो तमाशा सुरू आहे आणि त्यातून माथी भडकवली जात आहेत त्यावर तुम्ही कधी बोलणार? त्या व्यापाऱ्यांच्या विरोधात सरकारला खडे बोल कधी सुनावणार?असो. तुम्ही काय करावं हे तुमच्यापाशी. आमच्यासाठी मराठी भाषा आणि मराठी माणूस हे अंतिम सर्वोच्च प्राधान्य आहे. या देशात भाषिक आणि प्रांतिक अस्मिता या राहणारच, तशाच त्या महाराष्ट्रात देखील राहणारंच ! हे आमचं स्वत्व आहे आणि त्याबद्दल जेव्हा जेव्हा असे प्रसंग उभे राहतील तेव्हा तेव्हा महाराष्ट्र त्वेषाने उभा राहील, असेही राज यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. 

आणखी वाचा

भाषेच्या आधारावर भेदभाव म्हणजे आजार म्हणणाऱ्या मोहन भागवतांना राज ठाकरेंनी सुनावलं, म्हणाले, 'मराठी आमच्यासाठी सर्वोच्च प्राधान्य...'