मुंबई :  राज्याच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून मनसे (MNS) आणि शिवसेना (Shivsena UBT) यांच्या मनोमिलनाची चर्चा सुरू होती. दोन्ही पक्षांचे नेते सकारात्मक होते, अशातच आज (गुरूवार 12 जून) सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांची वांद्रे येथील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये झालेली गुप्त भेट चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. या भेटीमुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) - मनसे युतीला ब्रेक लागणार का, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) सकाळी ताज लँड्स हॉटेलमध्ये पोहोचले, आणि अवघ्या काही मिनिटांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील त्या ठिकाणी दाखल झाले. विशेष म्हणजे, फडणवीस यांच्या अधिकृत दौऱ्यामध्ये त्या ठिकाणी कोणताही कार्यक्रम नसताना देवेंद्र फडणवीसांनी ही भेट घेतल्याने, यामागे राजकीय रणनीती असल्याचं संकेत मिळू लागले आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. 10.35 मिनीटांनी फडणवीस हॉटेलमध्ये पोहोचले आणि पुन्हा 11.35 ला बाहेर पडले.

Continues below advertisement


एक तासभरापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची बैठक पार पडली. मनसेचे अध्यक्ष हे 9.40 ला ताज लँड्स एंडमध्ये त्यांचा ताफा पोहचला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 10.35 ला पोहचले होते. कोणतेही शेड्यूल नसताना दोन्ही नेते मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये भेटीसाठी पोहोचले. ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू असताना आता थेट राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांची भेट चर्चेचा विषय बनला आहे. भेटीनंतर दोन्ही नेते हॉटेलमधून बाहेर पडले. 


फडणवीस - ठाकरे भेटीचा राजकीय अर्थ काय?


या बैठकीत काय चर्चा झाली, हे अद्याप स्पष्ट झालेलं नसल्यामुळे भाजपने पुढील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेला जवळ करण्याचा प्रयत्न केला आहे का? असा सवाल उपस्थित होतोय. शिवसेना-मनसे युतीचं गणित बिघडवण्यासाठी हा राजकीय डाव होता का, याबाबत जोरदार चर्चा सुरू आहेत. दरम्यान,देवेंद्र फडणवीस किंवा राज ठाकरे यांनी या भेटीबाबत अधिकृत वक्तव्य दिलं नसून, यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.


गेल्या काही दिवसांपासून राज आणि उद्धव ठाकरे यांच्या मनोमिलनाच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होत्या. दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत अनेकजण या संभाव्य युतीबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून होते. विशेषतः मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी ही युती घडल्यास मोठे राजकीय समीकरण बदलू शकते, अशी चर्चा होती. मात्र, आता या सर्व चर्चांना राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील गुप्त भेटीनंतर विराम मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे 
यांच्यातील संबंध अलीकडच्या काळात पुन्हा सुधारताना दिसले. दोघे एकत्र येऊन भाजप विरोधात ताकद उभी करणार, असा अंदाज अनेकांनी वर्तवला होता.


मात्र, या संभाव्य युतीला ‘ब्रेक’ लागण्याचं मुख्य कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘राजकीय टाइमिंग’ असल्याचं बोललं जातं. गेल्या दहा वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रभाव टाकणारे फडणवीस हे खेळाचे जाणकार रणनीतीकार मानले जातात. त्यांनीच राज ठाकरे यांना योग्य वेळ साधून भेट घेऊन युतीपासून परावृत्त केलं असावं, असा कयास बांधला जात आहे. ही भेट मुंबईत वांद्रे येथील हॉटेलमध्ये झाली असून, ती पूर्वनियोजित नसल्याची चर्चा आहे. 


सध्या मनसे भाजपच्या जवळ जातेय?


या भेटीनंतर मनसे पुन्हा एकदा भाजपच्या जवळ जातेय का, हा प्रश्न समोर आला आहे. जर राज ठाकरे आणि फडणवीस यांच्यात युतीबाबत सकारात्मक चर्चा झाली असेल, तर ठाकरे गटाला आगामी निवडणुकीत मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.मएकूणच, महाराष्ट्रात आगामी महानगरपालिका निवडणुकांपूर्वीचे राजकारण चांगलेच तापले आहे, आणि या भेटींनी नवीन समीकरणांनाची उजळणी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.