Raj Thackeray And Uddhav Thackeray मुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी एक उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनासोबतच्या युतीवर मोठं विधान केलं आहे. आमच्यातील वाद, आमच्यातील भांडणं, आमच्यातील गोष्टी किरकोळ आहेत. त्यापेक्षा महाराष्ट्र खूप मोठा आहे. या महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं, हे वाद या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी घेतलेल्या मुलाखतीत राज ठाकरेंनी यावर भाष्य केलं आहे. 

Continues below advertisement


महेश मांजरेकरांनी राज ठाकरेंची मुलाखती घेतली. या मुलाखतीमध्ये शिवसेनेसोबत अजूनही एकत्र येऊ शकता का? असा स्पष्ट प्रश्न विचारण्यात आला. यावर मराठी माणसाच्या अस्तित्वापुढं वाद भांडण क्षुल्लक असल्याचं मोठं विधान राज ठाकरेंनी केलं. त्यामुळे राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना युतीचे संकेत दिलेत का असा सवाल उपस्थित होत आहे. 


राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?


महेश मांजरेकरांनी राज ठाकरेंची मुलाखती घेतली. या मुलाखतीमध्ये शिवसेनेसोबत अजूनही एकत्र येऊ शकता का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर या महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं, हे वाद या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत. त्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहाणं, यात काही मला कठीण गोष्ट आहे असं वाटत नाही. परंतु विषय फक्त इच्छेचा आहे. हा एकट्या माझ्या इच्छेचा विषय नाही आणि माझ्या स्वार्थाचाही विषय नाही. मला असं वाटतं, लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे, असं राज ठाकरेंनी सांगितले. तसेच सगळ्या महाराष्ट्रातील राजकीय पक्षातील मराठी लोकांनी एकत्र येऊन एकच पक्ष काढावा, असं विधानही राज ठाकरेंनी केलं आहे. 


उद्धव ठाकरे म्हणाले, मी मिटवून टाकली चला...-


किरकोळ भांडणे बाजूला ठेवायला मी तयार आहे,मी सर्व मराठी माणसांना महाराष्ट्रसाठी एकत्र येण्याचं आवाहन आहे.. पण एक अट आहे, जेव्हा आम्ही लोकसभेला सांगत होतो, हे सगळे उद्योग घेऊन गुजरातला जात आहेत, तेव्हाच विरोध केला असता तर महाराष्ट्र हिताचं सरकार केंद्रात आणि राज्यात बसवू शकलो असतो. तेव्हा पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायचा मग परत तडजोड करायची हे असं नाही चालणार. महाराष्ट्र हिताच्या आड जो कोणी येईल, त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला घरी मी बोलवणार नाही, त्याच्यासोबत पंक्तीला बसणार नाही, त्याचं आगत स्वागत करणार नाही, हे पहिलं ठरवा, मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा. बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो, जी भांडणं माझ्याकडून नव्हतीच, ती मी मिटवून टाकली चला, पण पहिलं हे ठरवा. उद्धव ठाकरे भारतीय कामगार सेनेच्या कार्यक्रमात बोलत होते.


महाराष्ट्रासाठी या सर्व गोष्टी घडल्या पाहिजेत- संदीप देशपांडे


मला वाटतं राज साहेब बोलले त्यातील आणखी एक महत्त्वाचं वाक्य आहे. ते वाक्य आहे की, 'समोरच्याची इच्छा आहे की नाही?'...हे जोपर्यंत समजत नाही, तोपर्यंत या गोष्टीला अर्थ नाही. आम्हाला सर्वांना वाटतं की, महाराष्ट्रासाठी या सर्व गोष्टी घडल्या पाहिजेत. मात्र, हे जसं आम्हाला वाटतं, तसं समोरच्यांना वाटतं की नाही? हा महत्त्वाचा प्रश्न आहे, असं मनसेचे नेते संदीप देशपांडे म्हणाले. 


मराठी माणूस म्हणून सगळ्या शक्ती एकत्र येणं गरजेचं- अंबादास दानवे


उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे असतील, हे दोघं तसे भाऊ आहेत. या विषयावर भले महाराष्ट्र चर्चा करत असेल. नेते प्रसार माध्यमं चर्चा करत असतील. परंतु भावाभावांचं नातं आहे, हे तर सर्वांनी मान्य केलं पाहिजे. राजकीय विषय स्वतंत्र आहेत. उद्धव साहेबांना किंवा त्यांच्या संघटनेला त्रास होईल, अशाच पद्धतीने राज ठाकरे यांनी भूमिका घेतल्या आहेत, असं ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे म्हणाले. मराठी माणूस म्हणून सगळ्या शक्ती एकत्र येणं गरजेचं आहे. मला वाटतं चॅनलमध्ये बोलून प्रस्ताव देता येत नसतो. यासाठी अनेक मार्ग आहे, असं अंबादास दानवे यांनी सांगितले. आताची मुलाखतसमोर आली म्हणून विषय व्हावा म्हणून चर्चा होण्याची गरज नाही. याबाबत मध्यस्थी करण्याबाबत अनेक लोक आहे, असं अंबादास दानवेंनी स्पष्ट केले.


उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीच्या प्रश्नावर राज ठाकरे काय म्हणाले?, VIDEO:



संबंधित बातमी:


Raj Thackeray : महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी सक्ती, स्वच्छ शब्दात सांगतो, आम्ही खपवून घेणार नाही; राज ठाकरेंचा इशारा