मुंबई: त्रिभाषा धोरणाबाबतचा निर्णय रद्द केल्यानंतर ठाकरेंची शिवसेना आणि मनसे 5 जुलै रोजी विजयी मेळावा साजरा करणार आहे . मुंबईतील वरळी डोम येथे ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांचा एकत्रित भव्य मेळावा होणार आहे. या मेळाव्यामध्ये पक्षीय अहंकार (इगो) बाजूला ठेवून या मेळाव्यासाठी झोकून काम करायचं असं शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच ठरलं आहे. 5 जुलै रोजी ठाकरे बंधू एकत्र मेळाव्यात दिसणार आहेत. या मेळाव्यासाठी दोन्ही पक्षाचे नेते मंडळी एकजुटीने काम करत आहेत, त्यामुळे या मेळाव्याचे विशेष नियोजन असणार आहे.
कसे असणार नियोजन काही ठळक मुद्दे:
सर्वप्रथम दोन्ही ठाकरेंचे पक्ष आणि त्यांचे नेते आपआपला पक्षीय अहंकार (इगो) बाजूला ठेवून या मेळाव्यासाठी झोकून देऊन काम करतील असं ठरलं आहे.
सोशल मिडीया, बॅनर, जाहिरातींद्वारे या मेळाव्याची जोरदार प्रसिद्धी केली जाण्याची जबाबदारीही दोन्ही पक्षांच्या विशेष टीमकडे सोपवण्यात आली आहे.
बॅनरबाजी, पोस्टर, घोषणाबाजीतून एकमेकांना डिवचले जाणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना केल्या जाणार आहेत.
गर्दीचे नियोजन ही मेळाव्यातील दोन्ही पक्षांची संयुक्त जबाबदारी असणार आहे. दोन्ही ठाकरेंच्या पक्षांमधील नेत्यांच्या विशेष टीम तयार करुन जबाबदारीचं वाटप केलं जाणार आहे.
मेळाव्यापूर्वी ठाकरे बंधुंच्या आगमनापासून भाषणापर्यंतची प्रत्येक गोष्टीची रंगीत तालीम शुक्रवारी केली जाणार असल्याचे बोलले जात आहे.
व्यासपीठावर केवळ पक्षाध्यक्ष / प्रदेशाध्यक्ष यांना स्थान दिले जाणार आहे. इतर सर्व नेते खाली व्यासपीठासमोर बसणार आहेत.
दोन्ही ठाकरे बंधू आणि इतर सहकारी पक्षांचे अध्यक्ष / प्रदेशाध्यक्ष आले तरी मोजक्याच नेत्यांची भाषण होतील.
आदित्य ठाकरे, अमित ठाकरे हे देखील व्यासपीठाच्या खालीच असणार आहेत. सर्व नेत्यांचा सन्मान जपला जाईल अशी आसनव्यवस्था असणार आहे.
मेळाव्याचा केंद्रबिंदु मात्र ठाकरे बंधुच राहणार आहेत. जिथे शक्य असेल तिथे एलईडी स्क्रीन लावल्या जाणार आहेत. विजयी मेळाव्याचं थेट प्रक्षेपण लोकांना पाहता येणार आहे.
वरळी डोममध्ये गर्दी झाल्यास डोमच्या गॅलरीही कार्यकर्त्यांसाठी खुल्या केल्या जाणार आहेत. वरळी डोम परिसरात मोकळ्या जागेत अतिरिक्त शेड टाकून बैठक व्यवस्था केली जाणार आहे.
मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी
पाच जुलैला मनसे - शिवसेना ठाकरे गट यांच्या वतीने विजयी मेळाव्याचे आयोजन वरळीच्या एनएससीआय डोम या ठिकाणी करण्यात आलं आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरवर राज ठाकरे उद्धव ठाकरे त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे यांचे एकत्र फोटो पाहायला मिळत आहेत. आम्ही गिरगावकर या संघटनेकडून ‘जी मराठी लोक चुकीची रिक्षा पकडून नागपूरला गेले आहेत त्यांनी परत मुंबईत ठाकरे बंधूंकडे या नाहीतर कायमचे गुजरातला पोहोचाल’ आणि सभा झाल्यावर आदेश द्या, मराठी महाराष्ट्र द्रोही लोकांना सरळ करायचे आहे. आम्ही आदेशाची वाट पाहत आहोत’ अशा आशयाचे बॅनर लावण्यात आलेले आहे. तसेच ब्रँड मराठीचा फक्त ठाकरेच महाराष्ट्र माझा अशा प्रकारचे बॅनर ही या परिसरात लावण्यात आले आहे.