Prakash Ambedkar on DEEKSHABHOOMI UNDERGROUND PARKING : दीक्षाभूमीच्या विकासासाठी राज्य सरकारने विकासात्मक आराखडा तयार केला होता. दीक्षाभूमी परिसरातील विकासासाठी सरकारने 200 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. या अंतर्गत दीक्षाभूमीच्या भूमिगत पार्किंगचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र, आंबेडकरी अनुयायांकडून कडाडून विरोध करण्यात आला. त्यानंतर भूमिगत पार्किंगला विरोध करण्यासाठी आंदोलनाला सुरुवात झाला होती. मात्र, जनभावना लक्षात घेता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भूमिगत पार्किंगच्या कामाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. याबाबत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. 


काय म्हणाले प्रकाश आंबेडकर? 


दीक्षाभूमी परिसरातील पार्किंगच्या कामाला स्थगिती देण्यात आली असली तरी येथे पार्किंग होणार नाही, अशी भूमिका घेणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी स्वत: सभागृहात येऊन याबाबतचे आवाहन केले पाहिजे. दीक्षाभूमी परिसरातील स्थानिकांनी बऱ्याचदा विरोध दर्शवला आहे. मात्र, राज्य सरकारकडून कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळेच दीक्षाभूमी परिसरात आंदोलन झाले. तिथल्या स्थानिकांनी अनेकदा विरोध केला आहे आमचाही या तारखेला विरोध आहे. ही जागा खुलीच राहिली पाहिजे. खुले मैदान आज राहिलेच नाहीत, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. 


अंडरग्राऊंड पार्किंग प्रकल्पाला आंबेडकरी अनुयायांचा कडाडून विरोध 


दीक्षाभूमीच्या विकासासाठी राज्य सरकारने विकासात्मक आराखडा तयार केला होता. दीक्षाभूमी परिसरातील विकासासाठी सरकारने 200 कोटींचा निधी मंजूर केला होता. मात्र यातील अंडरग्राऊंड पार्किंग प्रकल्पाला घेऊन आंबेडकरी अनुयायांनी विरोध केला आहे. अंडरग्राऊंड पार्किंग ही विजयादशमीच्या दिवशी येणाऱ्या लाखो अनुयायांच्या सुरक्षेच्या दृष्टीने  धोकादायक असल्याने हे काम तत्काळ थांबवावे अशी आंदोलकांची मागणी आहे. इतर विकासकामांमध्ये सुरक्षा भिंत, तोरण द्वार, दगडी परिक्रमा पथ, मुख्य स्तूपाची डागडूजी व सुशोभिकरणाला आंदोलकांचा विरोध नसल्याचे देखील आंदोलकांनी सांगितले. 


देवेंद्र फडणवीस स्थगिती देताना काय म्हणाले ?


भूमिगत पार्किंगचे काम स्मारक समितीमार्फत हाती घेण्यात आले होते. मात्र लोकभावना लक्षात घेता त्याला स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. एक बैठक घेऊन सर्वांच्या संमतीने निर्णय घेण्यात येईल. सर्वांचे मत विचारूनच त्यावर निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत बोलताना म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या 


दीक्षाभूमी परिसरातील भूमिगत पार्किंगच्या कामाला स्थगिती, देवेंद्र फडणवीसांची विधिमंडळात घोषणा!